रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना आजपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसून येणार आहेत. ज्यात रोहित शर्मा, शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालसारख्या स्टार खेळाडूंना संधी दिली गेली आहे.
भारताचा कर्णधार ३३६५ दिवसांनंतर रणजी ट्रॉफी खेळायला मैदानात उतरला. रोहित २०१५ मध्ये शेवटचा रणजी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.
रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूंचं मानधन ठरलेलं असतं. खेळाडूंना त्यांच्या अनुभवानुसार मानधन दिले जाते. एखाद्या खेळाडूला ४० पेक्षा अधिक सामने खेळण्याचा अनुभव असेल, तर त्याला दर दिवशी ६० हजार रुपये दिले जातात. म्हणजे एका सामन्यात खेळाडूंची ३ लाख रुपये कमाई होते. तर २१ ते ४० सामने खेळण्याचा अनुभव असलेल्या खेळाडूंना दरदिवशी ५० हजार रुपये दिले जातात.
म्हणजे एक सामना खेळण्याचे २.५० लाख रुपये दिले जातात. तर कमीत कमी २० सामने खेळण्याचा अनुभव असणाऱ्या खेळाडूंना ४० हजार रुपये दिले जातात. म्हणजे १ सामना खेळण्यासाठी १.६० लाख रुपये दिले जातात.
ज्या खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही, अशा खेळाडूंना देखील मानधन दिले जाते. अशा खेळाडूंना बीसीसीआयकडून ३० हजार, २५ हजार आणि २० हजार दिले जातात. रोहित शर्माच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याच्याकडे १२८ सामने खेळण्याचा अनुभव आहे.
यादरम्यान त्याने ४० पेक्षा अधिक रणजी सामने खेळले आहेत. तर ६१ प्रथम श्रेणी क्रिकेटचे सामने खेळले आहेत. रोहितकडे ४० पेक्षा अधिक सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्याला १ रणजी सामना खेळण्यासाठी ३ लाख रुपये मिळणार.
आऊट ऑफ फॉर्म रोहितने फॉर्ममध्ये परतण्यासाठी रणजी ट्रॉफी खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १० वर्षांनंतर रोहितचा रणजी क्रिकेट खेळण्याचा योग जुळून आला. या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रोहित अवघ्या ३ धावा करत तंबूत परतला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.