रणजी ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेत गतविजेत्या मुंबईने अखेर विजयाचं खातं उघडलं आहे. मुंबईला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बडोदाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यात मुंबईने दमदार कामगिरी करत विजयाची नोंद केली आहे. या सामन्यात मुंबईला विजयासाठी अवघ्या ७५ धावांची गरज होती. हे आव्हान मुंबईने सहज पूर्ण केले.
या सामन्यात महाराष्ट्राने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण महाराष्ट्राचा हा निर्णय फसला. कारण महाराष्ट्राचा संपूर्ण डाव १२६ धावांवर आटोपला.
या धावांचा प्रत्युत्तरात मुंबईकडून फलंदाजी करताना आयुष म्हात्रेने सर्वाधिक १७६ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने १४२ धावा चोपल्या. या दोन्ही फलंदाजांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर मुंबईने घरच्या मैदानावर खेळताना, पाहुण्यांचा चांगलाच पाहुणचार केला.
मुंबईने ४४१ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकडून पृथ्वी शॉ १, हार्दिक तामोरे ४, अजिंक्य रहाणे ३१, सूर्यकुमार यादव ७, शम्स मुलानी १६, शार्दुल ठाकूर १२, तनुष कोटीयन २८, मोहित अवस्थी शून्यावर माघारी परतला.
दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या सचिन धसने शानदार फलंदाजी करत ९८ धावा चोपल्या. त्याचं शतक अवघ्या २ धावांनी चोपलं. तर कर्णधार ऋतुराज गायकवाडने १४५ धावांची खेळी केली आणि अंकित बावनेने १०१ धावा केल्या. महाराष्ट्राकडून फलंदाजी करताना सिद्धेश वीर ०, आझिम काझी ७, निखिल नाईक ५, आशिष कुलकर्णी ०, सत्यजित बच्छाव २०, हितेश वालूंज ०, राजवर्धन हंगरगेकर ५ आणि प्रदीप दाढे शून्यावर नाबाद राहिला.
महाराष्ट्राने दुसऱ्या डावात ३८८ धावा करत मुंबईसमोर जिंकण्यासाठी ७५ धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान मुंबईने ९ गडी राखून पूर्ण केलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.