पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये सध्या अनेक बदल होतायत. या सगळ्या गोंधळावर पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह उल हकने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) कामकाजावर प्रश्न उपस्थित केलाय. इंग्लंड दौऱ्यात टेस्ट टीममधील सात खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांना अचानक मायदेशी पाठवण्याच्या निर्णयावरही त्याने नाराजी व्यक्त केलीये.
मिस्बाह उल हकने नुकताच पाकिस्तानच्या मुख्य सिलेक्टर पदाचा राजीनामा दिला. पाकिस्तानच्या निवड समितीतील सर्व सदस्यांना PCB ने कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यानंतर मिस्बाहने हे पद सोडलं. याच काळात इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या टेस्ट टीममध्येही PCB ने मोठे बदल केले.
मिस्बाहने एका टीव्ही कार्यक्रमात पाकिस्तानच्या प्रशिक्षकांबाबत आपलं मत स्पष्ट केलंय. पाकिस्तानमध्ये स्थानिक प्रशिक्षक आणि परदेशी प्रशिक्षक यांच्याशी सारखे वागले जात नाही, असं त्याने म्हटलंय.
त्याच्या मते, परदेशी प्रशिक्षकांना जास्त अधिकार दिले जातात. पण टीमची कामगिरी खराब झाली की देशातील प्रशिक्षकांवर जास्त टीका केली जाते. त्यांच्याकडे जास्त प्रश्न विचारले जातात आणि त्यांच्या कामाची जास्त तपासणी केली जाते. मिस्बाहने परदेशी प्रशिक्षक नेमण्याला विरोध केला नाही. पण पाकिस्तानमध्ये परदेशी प्रशिक्षकांवर जास्त विश्वास ठेवला जातो आणि त्यांच्याशी थोडे नरमपणे वागण्यात येतं.
पाकिस्तान टीमची कामगिरी खराब झाली की, लगेच मोठे बदल केले जातात, असं मिस्बाहचं म्हणणं आहे. त्याच्या मते, असं करण्याआधी टीम नेमकी कुठे कमी पडलीये हे पाहणं गरजेचं आहे. मिस्बाहने सांगितलं की, आपण दबावाखाली घाबरून कॉस्मेटिक सर्जरी म्हणजेच घाईघाईने वरवरचे बदल करू नयेत. आधी टीमची कामगिरी आणि सध्याची परिस्थिती नीट समजून घ्यावी. त्यानंतरच पुढे काय करायचं, हे ठरवावं.
पाकिस्तान क्रिकेटमध्ये दबाव वाढल्यानंतर लगेच निर्णय घेण्याची सवय आहे. ही पद्धत बदलण्याची गरज असल्याचंही मिस्बाहने सांगितलंय.
पाकिस्तानच्या युवा खेळाडूंबाबतही मिस्बाहने महत्त्वाचं मत मांडलंय. सध्या अनेक युवा खेळाडू टी-२० आणि वनडे क्रिकेट जास्त खेळतायत. मात्र त्यांना टेस्ट सामने खेळण्याची पुरेशी संधी मिळत नाही. टेस्ट सामने खेळल्यामुळे खेळाडूंना मोठा डाव खेळण्याची आणि जास्त वेळ मैदानावर राहण्याची सवय लागते. टेस्ट क्रिकेटमध्ये कठीण परिस्थिती आली तर त्याचा सामना करण्यासाठी हा अनुभव खूप उपयोगी ठरतो.
पाकिस्तान क्रिकेटमध्ये बदल करताना भारताकडून शिकण्याची गरज असल्याचंही मिस्बाहने सांगितलं. त्याच्या मते, भारताने १९९० च्या दशकानंतर त्यांच्या क्रिकेट व्यवस्थेत हळूहळू बदल केलेत.
भारताने क्रिकेटमध्ये सातत्याने गुंतवणूक केली आणि युवा खेळाडूंवर बराच काळ काम केलंय. यामुळे पुढे रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे मोठे खेळाडू तयार झाले, असं उदाहरण मिस्बाहने दिलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.