नवी दिल्ली : रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने मागील महिन्यात टी-२० विश्वचषक जिंकला. या स्पर्धेनंतर राहुल द्रविड यांचा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी भारतीय संघाच्या नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली. आता या पदाची जबाबदारी टीम इंडियाचा माजी सलामीवर ४२ वर्षीय गौतम गंभीरला मिळाली आहे.
गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर १५ वर्षांचं आहे. गंभीरने ११ एप्रिल २००३ साली आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू केलं. बांगलादेशविरोधात पहिला सामना ढाकामध्ये खेळला. गौतम गंभीरने त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली आहे.
२००७ टी२० आणि २०११ वनडे विश्वचषक स्पर्धेत गौतम गंभीरने आक्रमक फलंदाजीचा जलवा दाखवला होता. गंभीरने या दोन्ही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विजयी खेळी खेळली. गंभीरने २००७ टी-२० विश्वचषक स्पर्धेत ५४ चेंडूत ७५ धावा कुटल्या होत्या. या डावात गंभीरने २ षटकार आणि ८ चौकार लगावले होते. त्याचा स्ट्राइक रेट १३८.८८ टक्के इतका होता. तर या अंतिम सामन्यात भारताचा संघ शेवटच्या षटकात अवघ्या ५ धावांनी जिंकला होता. या अंतिम सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूपैकी गंभीरनेच एकमेव अर्धशतक ठोकलं होतं.
गंभीरने क्रिकेट कारकिर्दीत २०११ विश्वचषक स्पर्धेत ९७ धावांची आक्रमक खेळी खेळली. यामुळे भारताने दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला. वनडे विश्वचषक स्पर्धेचा शेवटचा सामना हा वानखेडे स्टेडियममध्ये श्रीलंकेविरुद्ध झाला.
या सामन्यात श्रीलंकेने भारताला २७४ धावांचे आव्हान दिलं होतं. या सामन्यात भारतीय संघाने ३१ धावांवर २ गडी गमावले होते. वीरेंद्र सहवाग (०) आणि सचिन तेंडुलकर (१८) धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर उतरलेल्या गौतम गंभीरने १२२ चेंडूत ९७ धावांची खेळी खेळली.
गंभीरला विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनीने साथ दिली. या सामन्यात गंभीरला शतक पूर्ण करता आलं नाही. गंभीरचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं. या डावात गंभीरने ९ चौकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट ७९.५० इतका राहिला. गंभीरने कठीण काळात सावध खेळी खेळली.
भारतीय संघाव्यतिरिक्त गौतम गंभीरने आयपीएल स्पर्धाही गाजवली. गंभीर केकेआरसाठी लकी चार्म ठरला. शाहरुख खानच्या केकेआर संघाने तीन वेळा आयपीएलचा चषक जिंकलाय. त्यात गंभीरचा वाटा मोलाचा आहे.
केकेआर संघाने २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएलचा चषक जिंकलाय. त्यावेळी गंभीर केकेआरचा कर्णधार होता. त्यानंतर केकेआर संघाने एकदाही चषक जिंकला नाही. त्यानंतर या संघाने २०२१ साली चषक जिंकला.
गौतम गंभीरने ४ डिसेंबर २०१८ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गंभीरने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना २०१६ साली इंग्लंड विरोधात राजकोटमध्ये खेळला होता. गंभीरने ५८ कसोटी सामन्यात ४१.९५ च्या सरासरीने ४१५४ धावा कुटल्या. त्यात ९ शतकाचा सामावेश आहे.
गंभीरने १४७ वनडे सामन्यात ३९.६८ च्या सरासरीने ५२३८ धावा कुटल्या. त्यात ११ शतकांचा समावेश आहे. तर गंभीरने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात झंझावाती खेळ दाखवलाय. ३७ सामन्यात ७ अर्धशतकांच्या मदतीने ९३२ धावा कुटल्या आहेत. या धावा २७.४१ च्या सरासरीने केल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.