टी २० वर्ल्डकपमध्ये फुशारक्या मारणाऱ्या पाकिस्तानची जिरवल्यानंतर भारतीय संघ सुपर ८ मध्ये पोहोचला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघानं सलग ३ विजय मिळवून धुमधडाक्यात सुरुवात केली आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारतीय संघाचा सामना आता नेदरलँडविरुद्ध होणार आहे. तीन सामने जिंकून सुपर ८ मध्ये एन्ट्री घेतल्यानं या सामन्यात फक्त औपचारिकता शिल्लक आहे. त्यामुळं काही महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
या स्पर्धेत भारत सुपर ८ मध्ये क्वालिफाय करणारा दुसरा संघ ठरला आहे. दुसरीकडं मंगळवारी झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळं रद्द झाला. त्यामुळं झिम्बाब्वे संघ सुपर ८ मध्ये पोहोचला. सुपर ८ मध्ये क्वालिफाय करणारा हा सातवा संघ ठरला आहे. त्यामुळे भारत सुपर ८ मध्ये कोणत्या तीन संघांशी भिडणार आहे, याबाबतचं समीकरण निश्चित झालं आहे.
भारतीय संघ टी २० वर्ल्डकपमधील सुपर ८ मध्ये प्रथम दक्षिण आफ्रिकेसोबत भिडणार आहे. ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात २२ फेब्रुवारीला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना होईल. दक्षिण आफ्रिका संघानं सुरुवातीचे तीन सामने जिंकले आहेत. पहिल्या लढतीत कॅनडाला पराभूत केलं. अफगाणिस्तानविरुद्ध चुरशीचा सामना झाला होता. यात निसटता विजय मिळवला. तर बलाढ्य न्यूझीलंडला तिसऱ्या सामन्यात ७ विकेट्सने धूळ चारली.
सुपर ८ मधील दुसरा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात होईल. २६ फेब्रुवारीला चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये ही लढत होईल. झिम्बाब्वे संघाला कमी लेखून चालणार नाही. त्यांनी बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला २३ धावांनी पराभूत केलं आहे. ओमानला ८ विकेट्सने मात दिली आहे. तर आयर्लंडविरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला. ऑस्ट्रेलिया संघ त्यामुळं स्पर्धेबाहेर झाला.
भारताचा सुपर ८ मधील अखेरचा सामना वेस्ट इंडीजविरुद्ध होणार आहे. वेस्ट इंडीजचा संघ तुफान फॉर्मात आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये १ मार्चला या फेरीतील अखेरचा सामना होईल. स्कॉटलंड, इंग्लंड आणि नेपाळ या तीन संघांना धूळ चारून वेस्ट इंडीजचा संघ सुपर ८ मध्ये पोहोचला आहे. त्यामुळं भारतासमोर तगडं आव्हान असणार आहे.
भारतीय संघाची टी २० वर्ल्डकपमधील कामगिरी आतापर्यंत तरी चांगली आहे. सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकून विश्वविजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचं सिद्ध केलं आहे. भारताची पहिली लढत अमेरिकेसोबत झाली होती. त्यात २९ धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात नामिबियाला पराभूत केलं. तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला एकतर्फी नमवलं आणि झोकात सुपर ८ मध्ये एन्ट्री केली. भारताने पाकिस्तानला ६१ धावांनी पराभूत केलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.