Ind vs Aus 4th Test: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४ मधील चौथ्या कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. मेलबर्नच्या मैदानात त्यांनी भारतीय संघाचा १८४ धावांनी पराभव केला. कसोटी मालिकेतील या दुसऱ्या पराभवामुळे भारताला फटका बसला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेमध्ये भारताचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्याचे आव्हान संपुष्टात आले असा अंदाज वर्तवला जात आहे.
भारतीय संघाने मेलबर्नचा महत्त्वपूर्ण सामना गमावला आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंकडून चांगला खेळ न केल्याने हा पराभव झाला असे म्हटले जात आहे. याशिवाय भारताकडून क्षेत्ररक्षणामध्येही दिरंगाई झाली. याउलट ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्हींमध्ये चांगली कामगिरी केली.
चौथ्या कसोटी सामन्यामध्ये भारताचा पराजय का झाला यामागील संभाव्य कारणे:
१. दोन्ही डावांमध्ये रोहित शर्माकडून अपेक्षित खेळ झाला नाही. पहिल्या डावात त्याने ३ तर दुसऱ्या डावात त्याने ९ धावा केल्या. दोन्ही वेळेस त्याला पॅट कमिन्सने बाद केले. शर्माच्या खराब फॉर्ममुळे डावाच्या सुरुवातीलाच भारतीय फलंदाजांवर दबाव आला. रोहित व्यतिरिक्त विराट कोहली आणि के. एल. राहुल या सीनियर खेळाडूंनीही चाहत्यांची निराशा केली. शिवाय रिषभ पंतही फारसा चमकला नाही.
२. भारतीय संघात मध्यम फळीतील फलंदाज सामन्यात अपयशी ठरले. पहिल्या डावात नितीश कुमार रेड्डीचे शतक आणि वॉशिंग्टन सुंदरचे अर्धशतक यांमुळे भारताची बाजू स्थिरावली. सुरुवातीलाच दबाव वरिष्ठ खेळाडू बाद झाल्याने मध्यम फळीवर दबाव पडला आणि त्याचा परिणाम धावसंस्थेवर झाला. भारताच्या उलट ऑस्ट्रेलियाची स्थिती होती. त्यांच्या सर्वात खालच्या फळीतील खेळाडूंनीही दोन्ही डावांत चांगल्या धावा केल्या.
३. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाचे पहिल्या डावामध्ये ४, तर दुसऱ्या डावात ५ गडी बाद केले. बुमराह व्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोलंदाजाला ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर दबाव टाकला आला नाही. सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये त्याने सर्वाधिक षटकं टाकली. त्याला दुसऱ्या गोलंदाजांची साथ मिळाली नाही. याउलट ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज भारतीय खेळाडूंवर वरचढ ठरले.
४. भारतीय क्रिकेटपटू क्षेत्ररक्षणामध्ये ऑस्ट्रेलियाच्या तुलनेमध्ये मागे पडले. या कारणामुळे ऑस्ट्रेलियन संघाने तगडी धावसंख्या उभी केली आणि भारताला आव्हान दिले. जैस्वालसह अनेक खेळाडूंकडून क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्याने मेलबर्नचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने वळला.
५. यशस्वी जैस्वालने पहिल्या डावामध्ये ८२ धावा केल्या आणि दुसऱ्या डावामध्ये ८४ धावा केल्या. दुसऱ्या डावामध्ये संघातील इतर कोणत्याही खेळाडूची त्याला साथ मिळाली नाही. तो एकटा शेवटपर्यंत लढत देत होता. जैस्वाल बाद झाला आणि एका प्रकारे भारताचा तेथेच पराभव झाला.
एकूणचं खेळाचे नियोजन आणि त्याची मैदानात अंमलबजावणी यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारतापेक्षा वरचढ ठरला आणि यामुळेच ऑस्ट्रेलियाचा विजय, तर भारताचा पराजय झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.