भारतीय संघाचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्याला आयपीएल २०२४ स्पर्धेदरम्यान जोरदार ट्रोल केलं गेलं. या काळात त्याचा डाऊन फॉल सुरु होता. मात्र त्याने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतून दमदार कमबॅक केलं आणि टिका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप जिंकून देण्यात हार्दिक पंड्याचाही मोलाचा वाटा राहिला आहे. दरम्यान हार्दिक पंड्याचा प्रवास कसा सुरु झाला? जाणून घ्या.
हार्दिक पंड्याचा जन्म ११ ऑक्टोबकर १९९३ रोजी गुजरातमधील चोर्यासी सुरत येथे झाला. हार्दिचे वडील सुरतमध्ये कार फायनान्सचा व्यवसाय करायचे. मात्र काही वर्षानंतर ते वडोदरामध्ये स्थलांतरीत झाले. इथे त्यांनी हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्याला किरण मोरे यांच्या क्रिकेट अॅकेडमीत प्रवेश करुन दिला.
पंड्या कुटुंब भाड्याच्या घरात राहत होते. क्रिकेट खेळण्यासाठी हार्दिकने शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पंड्या आपल्या क्लबमधील स्टार खेळाडू होता. त्याने आपल्या संघाला एकहाती सामने जिंकून दिले होते. हार्दिक १८ वर्षांचा होईपर्यंत लेग स्पिनर होता. मात्र त्याच्या प्रशिक्षकांच्या आग्रहावरुन त्याने वेगवान गोलंदाजी करायला सुरुवात केली.
हार्दिक पंड्या २०१३ पासून बडोद्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतोय. २०१३-१४ मध्ये झालेल्या हंगामात त्याने बडोद्याला सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या सामन्यात त्याने ८ षटकारांसह ८६ धावा चोपल्या होत्या.
हार्दिक पंड्याला २०१५ मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. २०१५ ते २०२१ पर्यंत त्याने या संघाचं प्रतिनिधित्व केलंय या संघाकडून खेळतानाही त्याने अनेकदा महत्वाची खेळी केली. २०२२ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला रिलीज केलं आणि गुजरात टायटन्सने त्याला आपल्या संघात स्थान दिलं. त्याला या संघाकडून नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पहिल्याच हंगामात त्याने या संघाला चॅम्पियन बनवलं. तर २०२३ मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये गुजरातने फायनलमध्ये धडक दिली होती. मात्र फायनलमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान २०२४ मध्ये झालेल्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात स्थान दिलं. यासह रोहितला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी मुंबई इंडियन्सकडे सोपवण्यात आली.
हार्दिक पंड्या उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आणि आक्रमक फलंदाज आहे. त्याने गोलंदाजी करताना अनेकदा महत्वाच्या वेळी विकेट्स काढून दिल्या आहेत. यासह फलंदाजी करताना मोक्याचा क्षणी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. त्याच्या टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ९३ सामन्यांमध्ये १३४८ धावा केल्या आहेत. तर ८६ वनडे सामन्यांमध्ये त्याने १७६९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ११ अर्धशतकं झळकावली आहेत. तर कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ११ सामन्यांमध्ये १ शतक आणि ४ अर्धशतकांच्या साहाय्याने ५३२ धावा केल्या आहेत .
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.