WTC Final, Team India : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही दिग्गज संघ ओव्हल मैदानात ७ जूनपासून हा अंतिम सामना खेळणार आहेत. WTC Final पूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी घोषणा केली आहे.
टीम इंडियाच्या व्यवस्थापकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या निवडीमुळे टीम इंडिया नक्कीच चॅम्पियन ठरेल, अशी खात्री आहे. कारण ते व्यवस्थापक असताना टीम इंडियाचा 'सक्सेस रेट' शंभर टक्के होता. (Latest sports updates)
बीसीसीआयने (BCCI) डब्ल्यूटीसी फायनल २०२३ साठी अनिल पटेल (Anil Patel) यांची भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापकपदी नेमणूक केली आहे. अनिल पटेल हे गुजरात क्रिकेट संघाचे सचिव आहेत.
याआधी अनिल पटेल यांनी टीम इंडियाचे व्यवस्थापकपद भूषवले आहे. २०१७, २०१८ आणि २०१९ मध्येही ते टीम इंडियाचे व्यवस्थापक होते. ते या पदावर असताना टीम इंडियाने ९ मालिका खेळल्या होत्या. त्या सर्व मालिकांमध्ये संघ विजयी झाला होता.
टीम इंडियातील सर्व खेळाडू २९ मे पर्यंत इंग्लंडला पोहोचतील. सध्या भारतीय खेळाडू आयपीएल स्पर्धा खेळत आहेत. भारतीय संघ १८ कसोटी सामने खेळल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे.
टीम इंडियाने १० कसोटी सामने जिंकले आहेत. ५ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. तर तीन कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. मागील वेळी भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, यावेळी भारतीय संघ बाजी मारणार, असा विश्वास टीम इंडियाच्या माजी दिग्गज खेळाडूंना आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.