खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आम आदमी पक्ष भ्रष्ट लोकांच्या हातात असून, तिथे काम करण्यासाठी तसं वातावरण नाही, असा आरोप चड्ढा यांनी केला. राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतला? भाजपमध्ये जाण्याचं निश्चित का केले? त्याआधी त्यांच्याकडे कोणते तीन पर्याय होते? या सर्व प्रश्नांची उत्तरं देताना आपली भूमिकाही त्यांनी व्हिडिओद्वारे स्पष्ट केली.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या राज्यसभेतील सात खासदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळं देशाच्या राजकारणात खळबळ उडाली. या सात खासदारांमध्ये राघव चड्ढा देखील होते. हे सर्व खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. या निर्णयानंतर राघव चड्ढा यांच्यावर पक्षातील नेत्यांनी टीका केली आहे. तसेच त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचे सांगितले जात होते.
आपचे खासदार संजय सिंह यांनी रविवारी राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांना एक पत्र पाठवून सातही खासदारांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी विनंती केली होती. यानंतर आज सोमवारी स्वतः राघव चड्ढा यांनी आपण भाजप का निवडला, आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय का घेतला? याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून बऱ्याच जणांचे मेसेज येत आहेत. मला शुभेच्छा देण्यात येत आहेत. काही लोकांना माझ्या या निर्णयामागची कारणे जाणून घ्यायची आहेत, असे ते म्हणाले.
आम आदमी पक्ष सोडण्यामागची कारणे यावेळी राघव चढ्ढा यांनी सांगितली. राजकारणात येण्याआधी मी सीए होतो. माझ्यासमोर अत्यंत चांगलं करिअर होतं. मी ते सोडून राजकारणात आलो. करिअर करण्यासाठी राजकारणात आलो नाही. एका पक्षाचा संस्थापक सदस्य झालो. ज्या पक्षाला माझ्या तारुण्यातील १५ वर्षे दिली, आपलं रक्त आटवलं, मेहनतीनं या पक्षाला उभं केलं, पण तोच पक्ष आता पूर्वीसारखा राहिला नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
या पक्षात आताच्या घडीला टॉक्सिक वर्क एन्वायरमेंट आहे. तुम्हाला काम करण्यापासून रोखलं जात आहे. संसदेत बोलण्यापासून रोखलं जातंय. हा राजकीय पक्ष काही भ्रष्ट लोकांच्या हातात आला आहे. आता देशासाठी नव्हे, तर वैयक्तिक फायद्यासाठी काम करत आहे. गेल्या काही वर्षांपासून मला तसं वाटत होतं. कदाचित एका चुकीच्या पक्षात मी योग्य माणूस होतो, असंही राघव चढ्ढा म्हणाले.
हे सगळं मनात सुरू असताना माझ्याकडे तीन पर्याय होते. राजकारणच सोडून द्यायचं हा पहिला पर्याय होता. दुसरा म्हणजे, या पक्षातच राहून सर्व काही पूर्वीसारखं करण्याचा प्रयत्न होता, पण तो काही यशस्वी झाला नाही. तर माझी ऊर्जा आणि अनुभव सगळं एकत्रित करून सकारात्मक राजकारण करायचं. इतर पक्षासोबत स्वतःला जोडून घेत सकारात्मक राजकारण करायचा हा तिसरा पर्याय माझ्याकडे होता, असं चड्ढा यांनी सांगितलं.
मी एकटाच नाही तर माझ्यासोबत आणखी सहा खासदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. एक माणूस चुकीचा असू शकतो, पण सर्व सात जण चुकीचे असू शकत नाहीत. असे असंख्य लोक होते, जे सुशिक्षित आणि या राजकीय पक्षासोबत एक स्वप्न घेऊन जोडले गेले होते, ते सर्व पक्षाला सोडून गेले आहेत. ते सगळे चुकीचे असू शकतात का? असा सवालही त्यांनी केला. मी पक्ष बदलत असलो तरी, तुमच्या अडचणी सातत्याने त्याच ऊर्जेने मांडत जाईल असं आश्वासन देतो. आता त्या अडचणींवरील उपायही शोधता येतील आणि अंमलबजावणीही होईल ही एक चांगली बाब आहे, असंही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.