सणासुदीचा सिझन सुरू होण्याआधीच साखरेच्या दरात मोठी वाढ झालीये. त्यामुळे वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सरकारने Raw sugar च्या आयातीशी संबंधित नियमांमध्ये बदल केला असून, आयात केलेली Raw sugar जास्त काळ साठवून ठेवता येणार नाही. आयातीनंतर ठरावीक कालावधीत तिच्यावर प्रक्रिया करून ती बाजारात विकणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे.
साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत असताना सरकारने सोमवारी Raw sugar च्या आयातीच्या नियमांमध्ये बदल केला. टॅरिफ रेट कोटा (TRQ) अंतर्गत भारतात आणलेल्या Raw sugar चे दोन महिन्यांच्या आत रिफायनिंग करून पांढऱ्या साखरेत रूपांतर करावं लागणार आहे. त्यानंतर ही साखर देशांतर्गत बाजारात विकणंही बंधनकारक असणार आहे.
यापूर्वी आयात केलेली साखर योग्य वेळेत प्रक्रिया करून 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत देशांतर्गत बाजारात विकण्याची अट होती. मात्र आता सरकारने प्रक्रिया आणि विक्रीसाठी स्वतंत्रपणे दोन महिन्यांची स्पष्ट मुदत निश्चित केली आहे.
कच्च्या साखरेच्या आयातीसंदर्भातील या बदलाची अधिसूचना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने (Ministry of Commerce and Industry) जारी केलीये. आयात केलेली Raw sugar मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्याला म्हणजेच साठेबाजीला आळा घालणं हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
आयात केलेली साखर लवकर प्रक्रिया करून बाजारात उपलब्ध झाल्यास त्याचा थेट फायदा ग्राहकांना होईल अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यामुळे साखरेच्या वाढलेल्या किमती काही प्रमाणात नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान सरकारने 31 ऑक्टोबरपर्यंत 10 लाख टन साखर आयात करण्यास परवानगी दिलीये. यासोबतच कोल्ड ड्रिंक आणि आईस्क्रीम तयार करणाऱ्या कंपन्या, संबंधित व्यापारी आणि मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी साठवणुकीची मर्यादाही निश्चित करण्यात आलीये. देशातील अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे साखरेची साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, सोमवारी देशभरातील साखरेचा सरासरी किरकोळ दर 63.05 रुपये प्रति किलो इतका होता. एका महिन्यापूर्वी हाच दर 48.73 रुपये प्रति किलो होता. म्हणजेच एका महिन्यात साखरेच्या दरात जवळपास 29 टक्क्यांची वाढ झाली आहे.
साखरेचे दर वाढण्यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जातंय. इंडियन शुगर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) चे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांच्या मते, देशात साखरेची कमतरता नाही. सध्याचा साखरेचा साठाही पुरेसा आहे.
मात्र, हवामानातील बदलांमुळे उसाचं उत्पादन कमी झाले आहे. त्याचा परिणाम साखरेच्या उत्पादनावर झाला आहे. याशिवाय महाराष्ट्रात उसाचे गाळप मोठ्या प्रमाणात झालं आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये उसाशी संबंधित अडचणी निर्माण झाल्या आहेत. या कारणांचाही साखरेच्या दरवाढीवर परिणाम झाला आहे.
याशिवाय साखरेची साठेबाजी आणि बाजारातील सट्टेबाजी हेदेखील दरवाढीमागचं महत्त्वाचं कारण मानलं जातंय. मोठ्या प्रमाणावर साखर खरेदी करणाऱ्या व्यापारी आणि ग्राहकांनी आधीच साठा करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेली साखर कमी झाली असून, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडल्याने साखरेचे दर वाढतायत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.