डोनाल्ड ट्रम्प हे भारत आणि पाकिस्तान यांचं युद्ध रोखू शकतात, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे नेते, विश्वगुरू आहेत, त्यांनीही इस्त्राइल-इराण यांच्यातील युद्ध रोखायला हवं. मोदी जागतिक नेते आहेत, तसा नेता आतापर्यंत झालेच नाहीत. त्यांनी आपल्या मित्रांना बोलून युद्ध रोखायला हवं, असे संजय राऊत म्हणाले. इतकेच नाही तर खामेनी यांच्या हत्याबाबत मोदींनी शोक व्यक्त करायला हवा होता. इराण नेहमीच भारताच्या बाजूने उभे राहिला आहे, त्यामुळे मोदींनी शोक व्यक्त करायला हवा, असे संजय राऊत म्हणाले.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा रविवारी मृत्यू झाला. त्याचे पडसाद भारतातही उमटले आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केली. खामेनी यांच्या हत्येबाबत पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त करायला हवा, असे ते म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला.जेव्हा अशा नेत्याची हत्या होते, तेव्हा भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी शोक व्यक्त करायला हवा. ते नेमके कोणाला घाबरत आहेत , इस्रायलला की अध्यक्ष ट्रम्प यांना? असे ते म्हणाले.
मोदीजी हे जागतिक नेते आहेत, त्यांनी इराण-इस्रायल संघर्ष थांबवायला हवा. मोदीजींनी त्यांच्या मित्रांना हे युद्ध थांबवण्यास सांगावे... इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खामेनी यांना इस्रायल वगळता संपूर्ण जगाने मान्यता दिली होती. ते भारताचे सच्चे मित्र होते, ज्यांनी नेहमीच आपल्या देशाला पाठिंबा दिला. ते नेहरूजींचे अनुयायी देखील होते. मोदीजींना याच गोष्टीचा राग आहे का?संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, इराणने संकटकाळात भारताला मदत केली आहे. भारत पाक संघर्षात त्यांनी भारताला पाठिंबा दिलाय. त्यामुळे भारताचे कर्तव्य आहे की शोक व्यक्त करावा. तुम्ही घाबरता का? तुम्हाला भीती वाटतेय का? डोनाल्ड ट्रम्प यांची तुम्हाला भीती वाटते का? इस्त्राइलची तुम्हाला भीती वाटते का? व्हेनझुयलाच्या प्रमुखाप्रमाणे उचलले जाईल असं वाटतं का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.
सैतानी कृत्य आहे. मुलांच्या शाळेवर हल्ला केला जातो. याचा निषेध सर्वांनी करायला हवा. मोदी त्यांना मिठी मारतात व पदक घालून येतात व गप्प बसतात यामागे काय आहे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. संकट आणखी गडद होईल, सगळ्या जगाला किंमत मोजावी लागेल. मोदींच्या गळ्यात लटकलेल्या मेडलमुळे महागाई कमी होणार नाही, असा टोलाही यावेळी संजय राऊत यांनी लगावला. संजय राऊत यांनी हे संकट अधिक गडद होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामेनी यांच्या हत्येनंतर शोक व्यक्त करायला हवा होता, अशी खंत राऊतांनी व्यक्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.