Rahul Gandhi Speech In Lok Sabha : नारीशक्ती वंदन घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चेत आज, शुक्रवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणावेळी सभागृहात मोठा गोंधळ झाला. भाजप हा दलित, ओबीसींना हिंदू म्हणते, पण त्यांना अधिकारापासून रोखलं जात आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.
नारीशक्ती वंदन घटनादुरुस्ती विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यात लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आणि केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रियांका गांधींचा उल्लेख करताना त्यांनी अमित शहा यांना चिमटा काढला. प्रियांका यांनी गुरुवारी असं काही केले की जे मी २० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत करू शकलो नाही. त्यांनी अमित शहांना हसवलं, असं ते म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांनी आपली आजी आणि माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्याशी संबंधित एक किस्सा सांगितला.
सरकारला आज ज्या विधेयकाला सभागृहात मंजूर करून घ्यायचे आहे, ते महिला आरक्षण विधेयक नाही. सरकार या विधेयकाच्या माध्यमातून देशाचं राजकारण बदलू पाहत आहे. त्यासाठी ते महिलांचा वापर करून घेत आहेत. महिलांच्या पाठीमागे लपून त्यांना हे करायचे आहे. महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्येच या सभागृहात मंजूर झाले आहे. सरकारने ते विधेयक सभागृहात मांडावे. सगळे विरोधी पक्ष तात्काळ हे लागू करण्यासाठी तयार आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :
या विधेयकाच्या माध्यमातून ओबीसी, दलित, मुस्लिमांकडील अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपला सत्तेत कायम ठेवण्यासाठी असा कायदा करण्यात येत आहे. देशाची दक्षिणेकडील राज्ये, ईशान्येकडील राज्यांचे प्रतिनिधीत्व हिसकावून घेण्याचा प्रयत्न होत आहे. हा देशद्रोह आहे, असे राहुल म्हणाले.
भाजप एकीकडे दलित आणि ओबीसी यांना हिंदू म्हणते, पण त्यांना कुठेगही स्थान दिले जात नाही. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून सभागृहात जोरदार गदारोळ झाला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोध दर्शवला. काही वेळ सभागृहात गोंधळ झाल्यानंतर राहुल गांधी यांचे भाषण पुन्हा सुरू झाले.
लोकसभेत राहुल गांधी यांनी एक गोष्ट सांगितली. त्यावर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना रोखले. या ठिकाणी जादूटोण्याची गोष्ट सांगू नका. त्यावर तुम्ही फक्त मजा घ्या, असे राहुल म्हणाले. यावेळी महिला आरक्षणावर बोलताना राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. हे विधेयक मंजूर होणार नाही, हे भाजपला ठाऊक आहे. तरीही भाजपने स्वतःला महिलांचे हित बघणारा पक्ष असल्याचे दाखवण्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले, असा आरोप त्यांनी केला.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला. राहुल गांधींची भाषा असंसदीय आहे. त्यावर तुम्ही केवळ विधेयकासंदर्भात बोला, असं ओम बिर्ला यांनी बजावलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.