नीट (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आंदोलनकर्त्या तरूणांच्या प्रमुख मागण्यांपैकी ही एक महत्त्वाची मागणी मान्य झाल्यानंतर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहीलंय की, "देशातील विद्यार्थ्यांविरोधात संपूर्ण व्यवस्था उभी राहिली आहे. बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर AK-47 मधून गोळीबार झाला. शेकडो विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांवर कोणताही एफआयआर होणार नाही आणि त्यांची सुटका केली जाईल, असं आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचं काय झालं?"
पुढे त्यांनी लिहिलंय की, "दिल्लीत विद्यार्थ्यांवर पेललेट गनचा वापर झाला, तर बिहारमध्ये AK-47 वापरण्यात आली. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि दिल्ली अशा विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी सरकारने दडपशाहीचा मार्ग स्वीकारला आहे."
शैक्षणिक व्यवस्थेवरही निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले, "सरकारमध्ये प्रामाणिकपणे शैक्षणिक सुधारणा करण्याची इच्छाशक्ती दिसत नाही. विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. पंतप्रधान मोदी तुम्ही देशातील विद्यार्थ्यांची माफी मागा."
दरम्यान, नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणावरून गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. आंदोलनाच्या वाढत्या दबावानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पदाचा राजीनामा दिला. या घडामोडीनंतर हा मुद्दा संसदेतही गाजण्याची शक्यता असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची चिन्हं आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.