सरसंघचालक मोहन भागवतांनी पंचाहत्तरीतील निवृत्तीसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मोदींच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच खास लेख लिहून मोहन भागवतांना पंचाहत्तरीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भागवतांनी वसुधैव कुटुंबकम या सिद्धांतापासून प्रेरणा घेतल्याचं सांगत त्यांनी भागवतांचं तोंडभरुन कौतूक केलंय.
मोहन भागवत 2009 मध्ये सरसंघचालक बनले.ते आजही उत्साहाने काम करतात.त्यांनी विचारसरणीशी कधीही तडजोड केली नाही.त्यामुळे संघाच्या 100 वर्षाच्या प्रवासातील भागवतांचा काळ परिवर्तनकारी आहे.त्यांनी ग्रामीण आणि मागास भागात व्यापक काम केलंय.याबरोबरच संघाच्या गणवेशात आणि शिक्षा वर्गात सुधारणा केली.राष्ट्रीय हित आणि नागरी कर्तव्यांचा समावेश असलेलं पंच परिवर्तन भागवतांनी मांडलं. एवढंच नाही तर एक भारत श्रेष्ठ भारत या तत्वाचे ते खंदे पुरस्कर्ते राहिले. भागवत वसुधैव कुटुंबकमचे मुर्तिमंत उदाहरण आहेत.
खरंतर 11 सप्टेंबरला मोहन भागवतांनी पंचाहत्तरी पूर्ण केलीय.तर 17 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी 75 वर्षे पूर्ण करत आहेत. त्यामुळे भाजपच्या अलिखित नियमानुसार मोदी पंचाहत्तरी पूर्ण करताच निवृत्त होतील, अशी चर्चा होती.तर मोहन भागवतांनीही याच दरम्यान पंचाहत्तरीसंदर्भात वक्तव्य केल्याने मोदी अस्वस्थ असल्याचंही म्हटलं जात होतं.मात्र भागवतांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींनी थेट लाल किल्ल्यावरुन संघाबद्दल गौरवोद्गार काढले.यातून संघ आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या सुप्त संघर्षाला विराम देण्याचा प्रयत्न केला.
लोकसभा निवडणुकीआधी भाजपला संघाची गरज नसल्याचं वक्तव्य नड्डांनी केलं होतं. त्यामुळे संघाने लोकसभा निवडणुकीपासून अंतर राखलं.यानंतर भाजपचं संख्याबळ 303 वरुन 240 वर आलं आणि पंतप्रधान मोदींनी थेट संघाचं मुख्यालय गाठलं.एवढंच नाही तर पंचाहत्तरीसंदर्भात सरसंघचालकांनी वक्तव्य केल्यानंतर मोदींनी लाल किल्ल्यावरुन संघाच्या शताब्दी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. एवढंच नाही तर आता पंचाहत्तरीनिमित्त सरसंघचालकांवरील विशेष लेखातून भागवतांच्या कार्यकर्तृत्वाचा कौतुक करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. त्यामुळे या लेखाच्या निमित्तानं मोदींनी पंचाहत्तरीतील निवृत्तीच्या चर्चांना पूर्ण विराम दिलाय का...? याचीच चर्चा रंगलीय.