राजस्थान: अशोक गेहलोत (Ashok Gehlot) सरकारने करौली, जोधपूर आणि त्यानंतर राजस्थानमधील भिलवाडा येथे झालेल्या दंगलींच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. तीन शहरांतील दंगलींशी संबंधित प्रत्येक पैलूची एसआयटी चौकशी करणार आहे. दंगल घडवण्यात बाहेरच्या घटकांचा हात होता का, हेही पाहिलं जाणार आहे. तर दुसरीकडे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात काही घटकांनी सुनियोजित कटातून तीन शहरात दंगल घडवून आणल्याचे समोर आले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबत अधिकृत माहिती दिली जाणार आहे.
पोलीस महासंचालक एमएल लाथेर यांनी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार नवसंवत्सरला करौली आणि ईदच्या एक दिवस आधी जोधपूरमध्ये सुरू झालेली दंगल यांचा संबंध तपासण्यात येणार आहे. जोधपूरमधील कर्फ्यू दरम्यान भिलवाडा येथे दंगल घडवण्याच्या प्रयत्नांचीही चौकशी केली जाणार आहे. या तिन्ही प्रकरणात पोलीस किती कालावधीनंतर सक्रिय झाले, याचाही तपास केला जाणार आहे.
अतिरिक्त पोलिस महासंचालक बिजू जॉर्ज जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यीय पथक तीन शहरांना भेटी देऊन स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची आणि अटक केलेल्या आरोपींची माहिती घेणार आहे. पोलीस महानिरीक्षक राजेंद्र सिंह, एसओजी पोलिस अधीक्षक गौरव यादव, अतिरिक्त पोलिस अधीक्षक किशोर बुटोलिया, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चक्रवती सिंह आणि पोलिस उपअधीक्षक रामचंद्र यांचा एसआयटीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
दुसरीकडे जोधपूरमध्ये शनिवारीही कर्फ्यू कायम होता. जोधपूरचे जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ता यांनी सांगितले की, शहरातील दहा पोलीस स्टेशन परिसरात सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त नवज्योती गोगई यांनी सांगितले की, आतापर्यंत 23 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. शांतता भंग केल्याप्रकरणी 227 जणांना अटक करण्यात आली होती, त्यापैकी बहुतेकांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आतापर्यंत 23 दंगलखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.