देवास, मध्य प्रदेश: मध्य प्रदेश राज्यातील (Madhya Pradesh) देवासमध्ये (Dewas) पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांवरून पतीने निर्दयतेची सीमा ओलांडली आहे. सुरुवातीला त्याने पत्नीला बेदम मारहाण केली, तिचे केस ओढले, तिला जमिनीवरही पाडले. यावरच त्याचे समाधान झाले नाही तर पत्नीच्या खांद्यावर बसून गावभर आपल्याच पत्नीची धिंड काढली तसेच पत्नीला चपलांचा हार घातला. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर मध्य प्रदेश सरकार विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात असल्याचं सांगत टीका केली आहे, त्यामुळे याचे पडसाद राजकारणातही उमटले आहेत. (Dewas Mp Tribal woman Viral Video)
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला तीन मुले आहेत. गेल्या एक आठवड्यापासून ती तिच्या पुरुष मित्रासोबत (प्रियकरासोबत) राहत होती. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली. देवासचे अतिरिक्त एसपी सूर्यकांत शर्मा यांनी सांगितले की, तिच्या पतीसह ११ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. देवास जिल्ह्यातील पुंजापुरा येथील बोरपाडाव गावात एक दिवसापूर्वी ही घटना घडली होती. त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
आठवडाभरापूर्वी ही महिला घरातून बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. पती आणि सासरच्यांनी तिचा खूप शोध घेतला. मात्र तरीही महिलेचा शोध न लागल्याने उदयनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. रविवारी तिच्या पतीला आपली पत्नी गावातच प्रियकराच्या घरी असल्याची माहिती मिळाली. यानंतर पती आणि सासरचे लोक तिला शोधत प्रियकराच्या घरी पोहोचले. तेथे महिला पेटीत लपलेली आढळून आली. यानंतर पतीने आणि सासरच्यांनी तिला बाहेर काढून बेदम मारहाण करत तिची धिंड काढण्यात आली.
पोलिसांनी आता महिलेला तिच्या माहेरी पाठवले आहे. या महिलेचे वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी लग्न झाले होते. आता तिचे वय ३० वर्ष इतके आहे. या महिलेला दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठी मुलगी १३ वर्षांची आणि धाकटी १० वर्षांची तर मुलगा ८ वर्षांचा आहे. असे सांगितले जात आहे की, काही दिवसांपूर्वी मुलांनी आपल्या आईला तिच्या प्रियकरासोबत पाहिले होते. हा प्रकार त्यांनी वडिलांना सांगितला. यावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. त्यानंतरच ही महिला घरातून निघून गेली होती.
उदयनगर पोलिसांनी आरोपी मुकेश, चिताराम, राहुल, नानुराम, गब्बर, बाळू, भोलिया, धर्मेंद्र, करण आणि छोटू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण बोर पाड्यातील रहिवासी आहेत. ग्रामीण एएसपी सूर्यकांत शर्मा यांनी सांगितले की, इतर अज्ञातांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना अटक केली आहे.
या घटनेवरून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्य सरकारला घेरले आहे. ते म्हणाले- शिवराजजी, मला तुम्हाला विचारायचे आहे की, राज्यात आदिवासी महिलांवर असे भयंकर अत्याचार का होत आहेत? शेवटी तुम्ही घोषणा देत राहण्याचे आणि आदिवासी महिलांवरील अत्याचार वाढतच राहण्याचे कारण काय? हे काही पहिले प्रकरण नाही. तुमच्या सरकारच्या आश्रयाने राज्यातील आदिवासींवर इतके अत्याचार होत आहेत, यावर आता मध्य प्रदेशातील जनतेने विश्वास ठेवावा का? तुम्ही आदिवासींच्या नावावर नौटंकी करत राहता आणि आदिवासींची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. माझ्या आदिवासी बंधू-भगिनींच्या अवस्थेची मला लाज वाटते, तुम्हालाही लाज वाटते का? अशी बोचरी टीका त्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ शिवराज यांच्यावर केली आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.