Maharashtra style split in TMC West Bengal : देशाच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोरआली आहे. महाराष्ट्रात झालेल्या ऐतिहासिक सत्तांतराची आणि पक्षांतराची पुनरावृत्ती आता थेट पश्चिम बंगालमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंगालच्या राजकारणात थेट 'महाराष्ट्र पॅटर्न' राबवला जात असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे तब्बल दोन तृतीयांश (२/३) आमदार आणि खासदार फुटण्याच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चेने देशात राजकीय भूकंप आणला आहे.
वृत्तानुसार, तृणमूल काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले बंडखोर आमदार ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपान साहा हे बंगाल विधानसभेत पोहोचले आहेत. या बंडखोर आमदारांनी ५० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही केला आहे. या दाव्यामुळे टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे. वृत्तानुसार, ऋतब्रता बॅनर्जी आणि संदीपान साहा यांनी कोलकाता येथील आमदार वसतिगृहात पक्षाच्या अनेक आमदारांची भेट घेतली. यामुळे टीएमसीमध्ये नवीन गट तयार होत असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
या मोठ्या दाव्यामुळे माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या 'तृणमूल काँग्रेस' (TMC) पक्षाला सर्वात मोठ्या अंतर्गत संकटाचा सामना करावा लागत आहे. पक्षातील आमदारांच्या बनावट सह्यांच्या 'साइनगेट' (Signgate) प्रकरणानंतर आता तृणमूल काँग्रेसमध्ये हुबेहूब 'महाराष्ट्र मॉडेल'सारखी फूट पडणार असल्याच्या दाव्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय आहे 'साइनगेट' (Signgate) प्रकरण?
पश्चिम बंगाल विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी तृणमूल काँग्रेसने आमदारांच्या सह्यांचे एक पत्र विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले होते. मात्र, तृणमूलच्याच ऋतब्रत बॅनर्जी आणि संदीपान साहा या दोन आमदारांनी आमच्या सह्या बनावट (Forged) असल्याचा आरोप केला. या बनावट सह्यांच्या वादामुळे ('साइनगेट') ममता बॅनर्जी यांनी या दोन्ही आमदारांना पक्षातून काढून टाकले. या प्रकरणाची सीआयडी (CID) चौकशी सुरू असून, तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
'महाराष्ट्र मॉडेल'चा दावा काय?
ममता बॅनर्जी यांच्या पक्षातून हकालपट्टी झालेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी आता थेट भाजपचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्या संपर्कात आहेत. तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेले नवनवीन कॅबिनेट मंत्री तापस रॉय यांनी फेसबुक पोस्ट करत दावा केला आहे की, "तृणमूल काँग्रेसमध्ये आता हुबेहूब महाराष्ट्रासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षाचे ५० पेक्षा जास्त आमदार कधीही बाजू बदलू शकतात."
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे २ तृतीयांश आमदार एकत्र येत पक्षातून बाहेर पडले आणि पक्षावर-चिन्हावर दावा केला, तसाच पॅटर्न आता बंगालमध्येही राबवला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.