मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेत. केंद्र सरकारच्या पेट्रोलमध्ये एथनॉल मिसळण्याच्या धोरणाचं समर्थन करताना त्यांनी या धोरणाला विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. “शुद्ध पेट्रोल हवं म्हणता पण शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का?” असा थेट सवाल त्यांनी केला.
रीवा विमानतळावरून भोपाल-रीवा आणि कोलकाता-रीवा विमानसेवा सुरू करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात जनार्दन मिश्रा भाषण करत होते. यावेळी त्यांनी देशातील पेट्रोलियम उत्पादन आणि परदेशातून होणाऱ्या तेलाच्या आयातीचा मुद्दा उपस्थित केला.
जनार्दन मिश्रा म्हणाले की, आपल्या देशात केवळ 20 टक्के तेलाचं उत्पादन होतं तर तब्बल 80 टक्के तेल परदेशातून आणावं लागतं. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरही तेलाच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. होर्मुज बंद झाल्याचा आणि हूती बंडखोरांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उल्लेख करत त्यांनी तेल मिळवण्यासाठी तब्बल 18 हजार किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत असल्याचं सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एथनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देत आहेत. पेट्रोलमध्ये 20 टक्के एथनॉल मिसळण्याच्या निर्णयाला काही लोक विरोध करत आहेत आणि त्यांना शुद्ध पेट्रोल हवं आहे. यावर मिश्रा यांनी आक्रमक भाषेत सवाल केला. “शुद्ध पेट्रोल हवं आहे, पण ते येणार कुठून? देशात शुद्ध पेट्रोल उपलब्धच नसेल तर ते आणणार कुठून? शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का?” असा सवाल त्यांनी केला.
एथनॉलला होणाऱ्या विरोधावरही भाजप खासदारांनी भाष्य केलं. ब्राझीलमध्ये 100 टक्के एथनॉलचं उत्पादन होतं आणि एथनॉलवर वाहनं चालतात. एथनॉलमुळे गाड्यांना कोणतीही अडचण येणार नाही. ऑटोमोबाईल कंपन्यांकडे यासाठी आवश्यक इंजिन तंत्रज्ञान उपलब्ध आहे. भारतातील वाहनंही एथनॉलवर चालण्यास सक्षम आहेत, असंही ते म्हणालेत.
“एथनॉलपासून गाडी चालवण्याची क्षमता भारतात आहे. आपल्या देशातील गाड्या एथनॉलवर चालू शकतात. पण लोक म्हणतात एथनॉल तयार करू नका. मग एथनॉल तयार करणार नाही, तर पेट्रोल आणि डिझेल कुठून येणार?” असा सवाल त्यांनी केला.
जनार्दन मिश्रा यांनी देशातील रोजगार आणि महागाईच्या परिस्थितीवरही भाष्य केलं. “आज जगात कुठे रोजगाराच्या सर्वाधिक संधी उपलब्ध आहेत, असा प्रश्न विचारला तर केवळ नोकऱ्या नव्हे तर रोजगाराच्या संधीही भारतात मोठ्या प्रमाणात आहेत. जगभर महागाई असतानाही भारतात महागाई सर्वात कमी आहे,” असं मिश्रा म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत मिश्रा यांनी 2014 आणि 2026 मधील भारताची तुलना करण्याचं आवाहन केलं. “2014 च्या भारतात आणि 2026 मध्ये नरेंद्र मोदींच्या भारतात काय फरक आहे? हा फरक जर तुम्हाला दिसत असेल, तर देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना योग्य उत्तर दिलं पाहिजे. जर तुम्ही असं करत नसाल, तर याचा अर्थ तुम्हाला देशाचा हा विकास नको आहे,” असं ते म्हणाले.
दरम्यान, जनार्दन मिश्रा यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत भाजप खासदारांवर निशाणा साधला.
पटवारी यांनी लिहिलं की, रीवामधून निवडून आलेले नरेंद्र मोदी सरकारचे खासदार आंदोलन करणाऱ्या नागरिकांना उद्देशून “एथनॉल नको, शुद्ध पेट्रोल हवं? शुद्ध पेट्रोल तुमच्या बापाच्या घरातून येणार आहे का?” असं म्हणत आहेत. पटवारी यांनी या वक्तव्याला सत्तेची ‘ठसक’ आणि जनतेने दिलेल्या मताच्या जोरावर आलेला ‘अहंकार’ असल्याचं म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.