बिहार निवडणुकीत इंडिया आघाडीनं डाव टाकला
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गेहलोत यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजदप्रणित इंडिया आघाडीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाचे चेहरे ठरले आहेत. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज, गुरुवारी २३ ऑक्टोबरला पत्रकार परिषद झाली. विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विजयी झाल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदी कोणते दोन चेहरे असतील याची घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, तर व्हीआयपीचे प्रमुख मुकेश सहनी हे उपमुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे गेहलोत यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय जनता दलाकडून तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रिपदाचे चेहरे असतील, तर व्हीआयपीचे मुकेश सहनी हे उपमुख्यमंत्रिपदाचे चेहरे आहेत. त्यामुळं या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला काय मिळालं? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला विजय मिळाला तर एनडीए सरकारप्रमाणे दोन उपमुख्यमंत्री असू शकतात, असे बोलले जात आहे. एक उपमुख्यमंत्री काँग्रेसचा असेल. तर इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचा असेल, अशीही चर्चा आहे.
अशोक गेहलोत यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आणि निकालानंतरची इंडिया आघाडीची रणनीती स्पष्ट केली. या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदासाठी राजद नेते तेजस्वी यादव यांच्या नावाला इंडिया आघाडीच्या सर्वच पक्षांचा पाठिंबा आहे. राहुल गांधी आणि इतर प्रमुख नेत्यांच्याही मनात तेजस्वी यादव यांचेच नाव होते, असेही गेहलोत यांनी सांगितले.
२०२० मध्ये तेजस्वी यादव यांची जादू चालली होती. ते विजयाच्या समीप पोहोचले होते. काही मतांच्या फरकाने आणि पैशांच्या बळावर एनडीएचं सरकार आलं होतं, असा आरोपही गेहलोत यांनी यावेळी केला.
बिहार काँग्रेसचे अध्यक्ष राजेश राम म्हणाले की, आज इंडिया आघाडी एकजुटीनं माध्यमांसमोर आली आहे. राहुल गांधी यांनी मतदान अधिकार यात्रेत इंडिया आघाडीच्या सर्व सदस्य पक्षांना सोबत घेऊन एसआयआर आणि जनहिताच्या मुद्द्यावर जवळपास १७ महिने काम केलं होतं, तेव्हाच इंडिया आघाडीची खऱ्या अर्थाने एकजुट झाली होती.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, कुणाचं नाव असेल याची उत्सुकता जेवढी तुम्हाला होती, तितकी उत्सुकता आम्हाला नव्हती, असं तेजस्वी यादव म्हणाले. इंडिया आघाडीच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल धन्यवाद मानतो. डबल इंजिनचं येथील सरकार आहे ते भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीत बुडालेलं आहे. ते हटवायचं आहे. आम्ही तरूण आहोत, नवीन बिहार करायचा आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाऊया, असा निर्धार त्यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.