Explainer Saam Digital
देश विदेश

Explainer : लांडगे माणसाचे शत्रू की मित्र? काय सांगतात रिपोर्ट; लाडंग्यांना संपवण्याचा रोमांचक इतिहास, वाचा सविस्तर

Sandeep Gawade

उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात अजूनही लांडग्यांची भीती कायम आहे. जिल्ह्यातील जवळपास ३५ गावांमध्ये लांडग्यांनी दहशत माजवली आहे. वन विभागाच्या टीमने आतापर्यंत चार लांडगे पकडले आहेत, पण अजून दोन लांडग्यांचा वन विभागाच्या अनेक टीम्स सतत शोध घेत आहेत. या दरम्यान रविवारी पुन्हा एकदा लांडग्याने गावकऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जुलैपासून आतापर्यंत लांडग्यांनी १० पेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे, ज्यात लहान मुलांची संख्या अधिक आहे. तर २५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. दरम्यान लांडग्यांचे अचानक हल्ले सुरू झाल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बहराइचसह अनेक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी आणि वन अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लांडगे आणि बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

लांडगा निसर्गाचा रक्षक?

मूळात लांडग्याला माणसाचा शत्रू मानलं जातं, पण हे कितपत सत्य आहे? बीबीसी अर्थच्या एका अहवालात या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उत्तर अमेरिकेत १५० वर्षांपूर्वीपर्यंत मोठ्या प्रमाणात लांडगे आढळत होते. जेव्हा लोक तिथे वस्ती करून राहू लागले तेव्हा त्यांना असं वाटलं की लांडगे आपल्यासाठी धोकादायक आहेत. तसेच जंगलातील प्राण्यांची ते शिकार करू शकतात, त्यामुळे उदरनिर्वाहाचा धोकाही त्यांना वाटू लागला. याच काळात लांडग्यांविरुद्ध एक आक्रमक मोहीम सुरू झाली, ज्यात ग्रे वुल्फ देखील समाविष्ट होते. शिकार करताना ग्रे वुल्फला लक्ष्य करण्यात आलं, आणि शेवटचा ग्रे वुल्फ येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये १९२६ साली मारला गेला.

लोककथा आणि चित्रपटांमध्ये लांडगा क्रूरच

लोककथा असो किंवा चित्रपट, लांडग्याला नेहमी एक क्रूर प्राणी किंवा माणसांचा शत्रू म्हणून दाखवण्यात आलं आहे. मात्र, सत्य यापेक्षा काहीसं वेगळं आहे. लांडगे माणसांवरूद्ध फार कमी आक्रमक असतात. उदाहरणार्थ, अमेरिकेत अशी एकही घटना नोंद नाही, ज्यात लांडग्याने माणसाचा जीव घेतला आहे. लांडग्यांचा अभ्यास करणाऱ्या जीवशास्त्रज्ञांनाही एक अनुभव आला आहे. जंगलात संशोधनादरम्यान ते नकळत लांडग्यांच्या अधिवासापर्यंत पोहोचले होते, मात्र लांडगे त्या परिसरातून निघून गेले आणि जीवशास्त्रज्ञ तिथून परतल्यानंतर लांडगे आपल्या अधिवासात परत आले.

अमेरिकेतील लांडग्याच्या हल्ल्याची आकडेवारी काय सांगते?

अमेरिकेच्या मोंटाना राज्यात २००९-१० दरम्यान सरकारने काही आकडे गोळा केले होते. या आकडेवारीतून समजले की लांडगा आणि इतर जंगली प्राण्यांच्या हल्यात केवळ ०.२३ टक्के प्राणांचा जीव गेला आहे. जनावरांच्या मृत्यूची पाच मोठी कारणे समोर आली. यात पाच लाखांहून अधिक जनावरे पचनासंबंधी समस्यांमुळे, ४९९००० जनावरं हवामान बदलामुळे, ४९४००० जनावरं प्रजननाच्या वेळी तर अज्ञात कारणांमुळे ४३५००० जनावरांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान लांडग्यांची मोठ्या प्रमाणात शिकार करण्यात आली, त्याचा नैसर्गिक परिस्थेवर परिणाम झाला, त्यामुळे इतर प्राण्यांच्या प्रजातींनाही अडचणींना सामोरं जावं लागलं.

बीवर संकटात

लांडग्यांची संख्या कमी झाल्यामुळे एल्क (एक प्रकारचं हरिण) सारख्या प्राण्यांची संख्या वाढली. या परिसरात लांडगे असताना एल्कची लांडगे शिकार करत होते. त्यामुळे त्यांची संख्या नियंत्रित रहात होती. मात्र लांडग्यांची संख्या कमी झाल्यामुले एल्कची संख्या वाढली आणि त्यांच्या खाण्याच्या गरजाही. त्यामुळे एल्कने एक विशिष्ट प्रकारच्या लाकडाच सेवन करायला सुरूवात केली. या लाकडाचा उपयोग बीवर त्यांचं (उंदरासारखा एक प्राणी) घर बनवण्यासाठी करत असतं. मात्र एल्कने लाकूड फस्त केल्यामुळे हिवाळ्यात बीवरला मोठ्या अडचणी आल्या, त्यामुळे त्यांच्या संख्येतही घट झाली.

ग्रे वुल्फची प्रजात वाढवण्यासाठी प्रयत्न

येलोस्टोनमध्ये १९२६ साली लांडग्यांच्या शेवटच्या गटाच्या शिकारीनंतर आजही इथल्या परिसंस्थेवर परिणाम जाणवत आहे. याच काळात ग्रे वुल्फची संख्या वाढवण्याचे प्रयत्न करण्यात आले. यामध्ये अमेरिकेच्या फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिस, यूएस पार्क सर्व्हिस, पर्यावरण संस्था, प्राणी संग्रहालये आणि नागरिकांच्या मदतीने पुन्हा एकदा लांडग्यांची संख्या पूर्वीप्रमाणे सामान्य पातळीवर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेत विविध ठिकाणी असलेल्या नॅशनल पार्कमध्ये लांडग्यांचे पुनरुत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरून ग्रे आणि रेड वुल्फला त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात परत आणता येईल.

लांडगे दूसऱ्या प्राण्यांसाठी अन्न सोडून जातात

लांडग्यांच्या पुनरुत्पादनाच्या प्रयत्नांमुळे नैसर्गिक परिसंस्थेवर सकारात्मक बदलही दिसत आहेत. नॅशनल पार्कमध्ये लांडगे आपले अन्न सोडून जातात, ज्यामुळे लहान प्राण्यांना ते खायला मिळते. याच दरम्यान बीवरच्या संख्येतही वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आणखी एख बाब महत्त्वाची बाब म्हणजे, या हल्ल्यांमागे रेबीज हे एक मोठं कारण आहे. नॉर्वेच्या निसर्ग संशोधन संस्थेच्या अहवालानुसार इंटरनॅशनल वुल्फ सेंटरने लिहिले आहे की, २००२ ते २०२० दरम्यान जगभरात लांडग्यांचे ४८९ हल्ले झाले, ज्यापैकी ७८ टक्के म्हणजेच ३८० हल्ले रेबीजमुळे झाले होते. तर केवळ ६७ हल्ले शिकारीसाठी करण्यात आले होते, तर ४२ हल्ले सुरक्षेसाठी केले होते.

भारतीय उपखंडात ६००० हजार लांडगे

इंटरनॅशनल वुल्फ सेंटरच्या मते, अंदाजे ४०० ते ११०० लांडगे हिमालयाच्या पायथ्याशी राहतात. तर भारतीय उपखंडात यांची संख्या अंदाजे ४००० ते ६००० पर्यंत आहे. उत्तर प्रदेशात १९९६-९७ दरम्यान लांडग्यांच्या हल्ल्यांवर सॅन फ्रान्सिस्कोस्थित लाइव जर्नलने एक अहवाल प्रकाशित केला होता. या अहवालात, एक सप्टेंबर १९९६ पर्यंत उत्तर प्रदेशमध्ये लांडग्यांच्या हल्ल्यांमध्ये ३३ मुलांचा मृत्यू झाला होता. तर २० मुलं गंभीर जखमी झाली होती. तर १० लांडग्यांना ठार करण्यात आलं होतं. तर १९९६-९७ दरम्यान लांडग्यांना ७४ लोकांना लक्ष्य बनवलं होतं, यापैकी बहुतेक १० वर्षांखालील मुलं होती. १८७८ मध्ये जगभरात लांडग्यांच्या हल्ल्यात ६२४ लोकांना जीव गमावला होता. बीबीसी हिंदीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT