भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात हजारो शेतकरी दिल्लीतील किसान घाटवर महापंचायतीसाठी रवाना
हरियाणा प्रशासनाने पंजाब-हरियाणा दरम्यानची शंभू सीमा पूर्णपणे सील केली
शेतकरी बस आणि खासगी वाहनांद्वारे दिल्लीत दाखल होत आहे
महाराष्ट्रातील नीट पेपर फुटीनंतर देशभरात एकच खळबळ उडाली. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी निदर्शने करत आहेत. दिल्लीत गेले २४ दिवस सुरु असलेल्या आंदोलनाने काल भयंकर वळण घेतले. मात्र विद्यार्थ्यांनंतर आता शेतकरी देखील भारत अमेरिका करार रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा घेऊन दिल्लीतील किसान घाटच्या दिशेने निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संसद परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात केली आहे.
दिल्लीतील किसान घाटवर पंजाब, हरियाणा तसेच इतर अनेक राज्यांतील हजारो शेतकरी आज आयोजित केलेल्या महापंचायतीत सहभागी होणार आहेत. यावेळी शेतकरी नेहमीप्रमाणे ट्रॅक्टर मोर्चा न काढता बस आणि खासगी वाहनांद्वारे दिल्लीत दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर हरियाणा प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करत पंजाब-हरियाणा दरम्यानची शंभू सीमा पूर्णपणे सील केली आहे. शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, त्यांचे हे आंदोलन भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात आहे. या करारामुळे देशातील कृषी क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि शेतकरी, तसेच लहान व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते.
मंगळवारी पहाटेपासून पंजाबमधील फतेहगड साहिबसह विविध भागांतून शेतकऱ्यांचे ताफे दिल्लीच्या दिशेने निघाले. सरकारपर्यंत आपला आवाज शांततेच्या मार्गाने पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. तसेच, वाटेत अडथळे निर्माण झाले तरी आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या संभाव्य मोर्चाच्या पार्श्वभूमीवर हरियाणा पोलिसांनी सोमवारी रात्रीच शंभू सीमेवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स उभारले. पंजाब आणि हरियाणाला जोडणाऱ्या घग्गर पुलावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्गांवर अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या घडामोडींमध्ये भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते गुरनाम सिंग चारुनी आणि राकेश बेन्स यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अंबालाजवळील शंभू टोल प्लाझा आणि हिसार-चंदीगड महामार्गावर आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.