Uttar Pradesh rain Death Toll : राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात वादळी वाऱ्याने हाहाकार माजवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी उत्तर प्रदेशात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने भीषण परिस्थिती निर्माण केली. निसर्गाच्या या कोपामुळे राज्याच्या विविध भागांत घडलेल्या दुर्घटनांमध्ये तब्बल ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या पावसामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.
प्रयागराज आणि भदोहीमध्ये सर्वाधिक फटका
वादळ आणि पावसामुळे उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत घरांची पडझड झाली आहे. सर्वाधिक जीवितहानी प्रयागराज आणि भदोही जिल्ह्यांत झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून वीजपुरवठाही खंडित झाला आहे. अवकाळी पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
अंगावर काटा आणणारा व्हिडिओ! वादळी वाऱ्यात टीन शेडसोबत तरुणही हवेत उडाला
बरेली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक व्हिडिओ समोर आला आहे. येथील तीव्र वादळी वाऱ्यामुळे एका दुकानाचा टीन शेड उडून गेला, पण या शेडला पकडून असलेला एक तरुणही वाऱ्याच्या वेगामुळे शेडसोबत थेट हवेत अनेक फूट उंचावर उडाला. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, एका दुकानावरचा पत्रा (टीन शेड) वाऱ्यामुळे उडू नये म्हणून एक तरुण तो हाताने दाबून धरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, त्या शेडसोबत हा तरुणही चक्क हवेत उडाला. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मदतीचे आदेश
राज्यात झालेल्या या भीषण जीवित आणि वित्तहानीची दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून बाधित कुटुंबांना आणि पीडितांना सानुग्रह मदत देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जखमींना तातडीने उपचार पुरवण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
दिल्लीला वादळी पावसाचा तडाखा; विमान वाहतूक विस्कळीत
राजधानी दिल्ली आणि परिसरात ताशी ९० ते ९८ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली आहे. या नैसर्गिक संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. हवामान खराब असल्यामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील १५ विमानांचे लँडिंग जयपूर, चंदीगड आणि लखनौकडे वळवण्यात आले आहे. विमान उड्डाणे रद्द झाल्याने किंवा विलंबाने होत असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.