टीएमसी आणि शिवसेनेनंतर देशातील आणखी एक पक्ष फुटणार
मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी समाजवादी पक्षात फूट पडणार असल्याचा दावा केला
समाजवादी पार्टीचे काही खासदार पक्ष सोडून भाजपमध्ये जाण्याची शक्यता
मंत्र्याच्या विधानामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण तापले
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेच्या फुटीनंतर आता देशामध्ये आणखी एक मोठा पक्ष फुटण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षातही फूट पडू शकते असा दावा उत्तर प्रदेशचे मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी केला आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत समाजवादी पक्षात फूट पडल्याचा दावा केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार आहे. राम गोपाल यादव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र सादर केले आहे. ओम प्रकाश राजभर यांच्या या पोस्टनंतर समाजवादी पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
ओम प्रकाश राजभर यांनी पुढे असे सांगितले की, खाण घोटाळा आणि गोमती रिव्हर फ्रंट घोटाळ्यामागे सूत्रधार कोण आहे हे संपूर्ण उत्तर प्रदेशला माहिती आहे. समाजवादी पक्षाचा फास आवळत असल्याने तो पक्ष चिंतेत आला आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल सोडाच संपूर्ण समाजवादी पक्ष भाजपमध्ये सामील होण्यास तयार आहे. राजभर यांच्या या विधानामुळे आता उत्तर प्रदेशमधील राजकारण आणखी तापले आहे.
एक्सवरील पोस्टमध्ये ओम प्रकाश राजभर यांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी दावा केला की, 'सपाचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव यांनी अमित शाह यांना एक गोपनीय पत्र दिले होते. पत्र दिल्यानंतर राम गोपाल हसत निघून गेले. पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि महाराष्ट्रात उद्धव यांच्यासोबत जे घडले तीच गत आता उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीची होईल. राम गोपाल यांनी पत्रात अशा खासदारांची नावे दिली असतील जे पक्षातून बाहेर पडू शकतात. सपाचे अनेक खासदार पक्षातून बाहेर पडणार आहेत. जे खासदार सपातून बाहेर पडतील ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
यावेळी ओम प्रकाश राजभर यांनी सपाच्या ब्राह्मण संमेलनावरून अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, जातीव्यवस्थेत ब्राह्मण सर्वात विद्वान आहेत. आता अखिलेश यादव ब्राह्मणांना शिक्षित करण्याचे काम करत आहेत. इटावा येथील कथाकार वादाच्या वेळी अखिलेश यादव म्हणाले होते की, यादवसुद्धा गोष्टी सांगू शकतात. यावर ओ.पी. राजभर म्हणाले की, 'सपाच्या ब्राह्मण संमेलनात फक्त यादवच दिसतील. ज्याप्रमाणे बसपाच्या सभांमध्ये कार्यकर्त्यांचे नेते जेएनयूच्या गणवेशात बसायचे त्याचप्रमाणे सपा ब्राह्मण संमेलनात यादवांना बसवेल.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.