फैय्याज शेख, साम टीव्ही
भिवंडीमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून व्यापऱ्यांना धमकावून पैसे उकळणाऱ्या टोळीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सध्या अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे अनेकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, याच परिस्थितीचा गैरफायदा घेत तोतया महिलांची टोळी सक्रिय झाली होती. मागील पंधरा दिवसांपासून भिवंडीतील शांतीनगर परिसरातील हॉटेल्स आणि किरकोळ विक्रेत्यांना ही टोळी लक्ष्य करत होती. ही टोळी स्वतःला FDA अधिकारी असल्याचे भासवत शिळे, अस्वच्छ अन्न विक्री तसेच मुदतबाह्य माल विक्रीचे आरोप करत व्यापऱ्यांना धमकावत होती आणि त्यांच्याकडून पैशांची मागणी करत होती.
या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सागर प्लाझा हॉटेल परिसरात धाव घेतली. मात्र पोलिस येण्यापूर्वीच दोन महिला आणि एक पुरुष घटनास्थळांवरून पसार झाले. तरीही शांताबाई दशरथ राजपूत या महिलेला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात यश आले. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, समशाद खान आणि जावेद मोहम्मद चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिच्यासह अन्य तीन साथीदारांविरोधात खंडणी उकळणे आणि तोतया अधिकारी बनून धमकावणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शांताबाई राजपूत हिला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. व्यापाऱ्यांनी कोणतीही अधिकृत तपासणी असल्यास संबंधित अधिकाऱ्यांची ओळख पटवूनच सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.