संजय गडदे
भाजप आणि मनसेमधील राजकीय वाद आता अधिकच पेटण्याची चिन्हे दिसत असताना या वादात शिंदेसेनेनेही उडी घेतली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि शिंदेसेनेचे नेते सिद्धेश कदम यांनी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत थेट आक्रमक भूमिका घेतली.
मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील नेस्को संकुलात प्लास्टिक रिसायकलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सिद्धेश कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अमित ठाकरे यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली.
“अमित ठाकरे यांचे हे वर्तन म्हणजे बालिशपणा आहे. कुठेही आक्रमकता दाखवायची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, हे विसरायचे,” असा टोला सिद्धेश कदम यांनी लगावला.
पुढे अधिक आक्रमक होत कदम म्हणाले, “जगाच्या नकाशावर मोदी साहेबांचा वर्चस्व आहे. तुम्हाला ते मान्य नसेल तर तुम्ही पाकिस्तानमध्ये जा. तुम्ही भारतात कशाला राहता?”
कदम यांच्या या जहाल वक्तव्यामुळे भाजप-मनसे वादाला आता शिंदेसेनेच्या आक्रमक भूमिकेची फोडणी मिळाली आहे. अमित ठाकरे यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला राजकीय संघर्ष आता तीन पक्षांमध्ये रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिद्धेश कदम यांच्या “पाकिस्तानात जा” या वक्तव्यावर मनसेकडून काय प्रतिक्रिया येते, तसेच अमित ठाकरे किंवा मनसेचे वरिष्ठ नेते यावर प्रत्युत्तर देतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या वक्तव्यावरून भाजप, मनसे आणि शिंदेसेनेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.