कल्याण-नगर महामार्गावर रायते पुलानजीक झालेल्या भीषण अपघाताबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या अपघातात व्हॅनचालकाने धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचं कल्याण आरटीओच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला होता, तर काही जण गंभीर जखमी झाले होते.
कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी आशुतोष बारकुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. तसेच चालकाने वेग आणि सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून हा भीषण अपघात घडला.
या घटनेनंतर आरटीओने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षभरात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांविरोधात १८०० कारवाया करण्यात आल्याची माहिती बारकुल यांनी दिली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर पुढील काळात आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या दुर्घटनेमुळे प्रवासी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
११ जणांच्या मृत्यूनंतरही बेफिकीरपणा कायम असून, कल्याण-भिवंडी मार्गावर अजूनही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. वाहतूक पोलिसांनी अशा वाहनचालकांवर कारवाई सुरू केली आहे.
कल्याण-मुरबाड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ११ निष्पाप जीवांचा बळी गेला. मात्र या घटनेनंतरही टॅक्सीचालकांचे डोळे उघडलेले नाहीत. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून भिवंडी, पडघा आणि श्री मलंगगडच्या दिशेने अजूनही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून धोकादायक वाहतूक सुरूच आहे. आता या मुजोर चालकांना वेसन घालण्यासाठी कल्याण वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत.
सकाळपासूनच धडक कारवाईला सुरुवात केली आहे. ६ ते ७ प्रवाशांची क्षमता असताना, जास्तीच्या पैशांच्या हव्यासापोटी टॅक्सीचालक ८ ते १२ प्रवाशांना घेऊन जात आहेत. यामध्ये लहान मुले, महिला आणि वयोवृद्धांच्या जिवाची पर्वा केली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
भिवंडी, मलंगगड रोड आणि मुरबाडच्या दिशेकडील वाहतूक जीवघेणी होत आहे. या जीवघेण्या प्रवासाला लगाम लावण्यासाठी कल्याण वाहतूक पोलिसांनी आता कंबर कसली आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात विशेष पथके तैनात करून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
सकाळपासून अनेक टॅक्सींवर १० ते १२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईचे विशेष म्हणजे, हा दंड आता जागीच न भरता वाहन चालकांना न्यायालयात जाऊन भरावा लागणार आहे. या कडक कारवाईमुळे नियम मोडणाऱ्या चालकांचे धाबे दणाणले आहे. केवळ पोलीस कारवाई पुरेशी नसून नागरिकांनीही नियमानुसारच वाहनात बसावे आणि जास्तीचे प्रवासी भरणाऱ्या चालकांविरोधात तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.