Raj Thackeray, Ganeshotsav riots : आगामी गणेशोत्सवाच्या काळात देशासह महाराष्ट्रात आणि मुंबईत जाणीवपूर्वक दंगली घडवल्या जाण्याची दाट शक्यता आहे, असा खळबळजनक दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते ठाण्यात बोलत होते. देशातील बेरोजगारी, आर्थिक मंदी, नीट (NEET) घोटाळा आणि उद्योग बाहेर जाण्यासारख्या गंभीर मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष उडवण्यासाठी जनतेला 'धर्माची झिंग' चढवली जात असल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर सुजाण हिंदू आणि मुस्लिमांनी अत्यंत सतर्क राहिले पाहिजे, असे कळकळीचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी धार्मिक राजकारण
आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी देशातील आणि राज्यातील बिघडत चाललेल्या परिस्थितीवर बोट ठेवले. ते म्हणाले, देशाची आर्थिक परिस्थिती ढासळत चालली आहे. सर्वाधिक बेरोजगारी वाढली असून २०२१ ते २०२६ दरम्यान तब्बल ५०३ परदेशी कंपन्यांनी कामकाज बंद केले आहे. २०१८ पासून १३ हजार उद्योगपती देश सोडून गेले आहेत. तर दर ४८ मिनिटाला एक शेतकरी किंवा विद्यार्थी आत्महत्या करत आहे. मात्र, या मूळ प्रश्नांवरून जनतेचे लक्ष बाजूला करण्यासाठी नागरिकांना धर्मांध बनवले जात आहे.
गणपती उत्सवात दंगली घडवण्याचा कट
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासनावर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले, गणपती सणाच्या काळात दंगली घडवल्या जातील. याचीच एक झलक आता मुंबईत पाहायला मिळाली आहे. सर्वसामान्यांना भलत्याच गोष्टींमध्ये गुंतवून ठेवले जात आहे. अशा वेळी देशातील सुजाण हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांनी वेळीच लक्ष दिले पाहिजे आणि सतर्क राहिल पाहिजे.
अमराठींना मुद्दाम बोलायला लावले जातेय
नवी मुंबईत होणाऱ्या हिंदी भाषिक संमेलनावरही त्यांनी भाष्य केले. मुद्दाम अमराठी लोकांना बोलायला लावले जात आहे. नवी मुंबईत हिंदी भाषिक संमेलन भरवून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची हिंदी काही सुधारणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, जंगले तोडली जात आहेत, जमिनी हडपल्या जात आहेत, शाळांच्या बाहेर ड्रग्ज मिळत आहेत आणि मतदार याद्यांमधून ७० ते ७५ टक्के नावे गायब होत आहेत. तरीही सगळे शांत कसे? असा सवाल त्यांनी केला.
सण-उत्सव साजरे करा, पण धर्मांध होऊ नका
महाराष्ट्राच्या संस्कृतीवर बोलताना ते म्हणाले, "सण आनंदाने साजरे करा, पण डीजे आणि लाऊडस्पीकरच्या अतिवापरामुळे अनेकांचे प्राण जात आहेत. गोविंदा उत्सवात महिलांना नाचवले जात आहे, हे महाराष्ट्राचे संस्कृतीकरण नाही. धर्मांधपणा आपल्याला संपवून टाकेल. त्यामुळे येत्या गणपती उत्सवात जर काही संशयास्पद घडताना दिसले किंवा दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला, तर जागे व्हा आणि सतर्क राहा, असा इशारा राज ठाकरे यांनी शेवटी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.