महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींचा अंदाज
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे यलो अलर्ट
मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसासाठी यलो अलर्ट
राज्यात सध्या तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असून, आज काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज १५ ऑगस्ट रोजी राज्यातील मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर आज जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तसेच पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता असल्याने या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाच्या वेळी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उर्वरित महाराष्ट्रातही पावसाची शक्यता कायम असून, काही ठिकाणी श्रावण सरींचा अनुभव येऊ शकतो. पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईत गेल्या २ दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह उपनगरात आज मुसळधार पावसाचा यलो अलर्ट दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसाने मुंबईतील तलावांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.