अक्षय बडवे, साम टिव्ही
टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुनर्विचार याचिका दाखल करावी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशा विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील सर्व शाळा उद्या बंद करून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षक व शिक्षकेतर संघटना समन्वय समितीच्यावतीने मोर्चा काढणार आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, मुख्याध्यापक, संस्थाचालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटनांचा समावेश असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीचे अध्यक्ष शिवाजी खांडेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
शिवाजी खांडेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या TET विषयक अनिवार्यतेच्या निर्णयास अनुसरून प्राथमिक शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास होत असलेली अनावश्यक विलंब प्रक्रिया, तसेच शिक्षण विभागाकडून निकालाचा चुकीचा अर्थ घेऊन सुरू असलेली कार्यवाही यामुळे राज्यातील शिक्षकवर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, मुख्याध्यापक, संस्थाचालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटनांचा समावेश असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीच्या बैठकीत 5 डिसेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
खालील प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.
1. TET निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी.
2. TET निकालाचा चुकीचा अर्थ काढून विविध कार्यालयांकडून सुरू असलेली कार्यवाही तात्काळ थांबवावी.
3. म.ना.से. नियम 1982 व 84 अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी.
4. शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी.
5. शिक्षकांनाही 10, 20, 30 वर्षांनंतरची सुधारित तीन वेतन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी.
6. १५ मार्च २०२४ चा संचमान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा.
7. राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभरती तात्काळ सुरू करावी.
8. शिक्षकांवरील विविध अशैक्षणिक व ऑनलाइन उपक्रम तात्काळ थांबवावेत.
9. विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी भेदभाव न करता मंजूर करावी.
10. वस्तीशाळेतील शिक्षकांची सेवा मूळ नियुक्ती तारखेपासून सर्व लाभांसाठी ग्राह्य धरावी.
11. आश्रमशाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचे धोरण रद्द करण्यात यावे.
12. कमी पटाच्या शाळा बंद न करता शिक्षणक्रम सुरू ठेवावा.
13. शिक्षकांचे इतर सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.