राज्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची पुन्हा जोरदार सुरुवात
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये यलो अलर्ट असून मुसळधार पावसाची शक्यता
पुढील ४८ तास महत्त्वाचे
Maharashtra Weather Update Today News राज्यात ४ दिवसापांसून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. रविवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये चांगलीच हजेरी लावली असून हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना मंगळवारी यलो अलर्ट देण्यात आला असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान जोरदार झालेल्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक मंदावली असून लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. पुढील ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागातही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून स्थानिक प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे घाटमाथा तसेच विदर्भातील अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांमध्येही ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
IMD च्या अंदाजानुसार १ जुलैपासून मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. २ जुलैपर्यंत संपूर्ण कोकण विभागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. याचा परिणाम घाटमाथ्यावरील भागांवरही दिसून येणार असून पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट परिसरातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मान्सूनने २४ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. त्यानंतर त्याने गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडच्या काही भागांमध्ये पुढे वाटचाल केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची प्रगती मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे. सोमवारी मान्सूनची कोणतीही विशेष प्रगती नोंदवली गेली नाही. तरीही वातावरणातील अनुकूल परिस्थिती लक्षात घेता पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.