ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे पक्षफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. तर, दुसरीकडे महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र आहे. भाजपकडून शिंदेसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फोडाफोडी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं चित्र आहे. शनिवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे दिव्यज फाउंडेशनच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली होती. मात्र, दोन्ही नेते एकमेकांपासून दूर बसले होते. यानंतर चर्चांना उधाण आलं.
काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी वाढली होती. अलिकडेच एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी अमित शहांजवळ महाराष्ट्रातील भाजप नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे. त्यानंतर शनिवारी मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील दुरावा ठळकपणे दिसून आला. दोन्ही नेत्यांमध्ये २ खुर्चींचा अंतर होता.
या दुराव्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या सर्व प्रकरणावर पडदा टाकला आहे.
फडणवीस - शिंदे यांच्यात कोणताही दुरावा नाही
सीएमओकडून दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, या कार्यक्रमात प्रत्येक पाहुण्यांची आसनव्यवस्था आधीच निश्चित केली होती. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात २ खुर्च्यांचे अंतर होते. या दोन खुर्च्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासाठी राखीव होत्या. त्या खुर्च्यांवर त्यांची नावेही लिहिली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांपासून अंतर ठेवून बसल्याचा दावा चुकीचा आहे, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.