सागर आव्हाड, साम टीव्ही
खडकवासला कालव्याचे हक्काचे आवर्तन वेळेत न मिळाल्यामुळे इंदापूर तालुक्यातील सुमारे ३६ गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रशासनाने लेखी आश्वासन देऊनही पाणी न सोडल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज पुण्यातील शनिवार पेठ येथील खडकवासला पाटबंधारे विभागाच्या 'सिंचन भवन'कार्यालयासमोर तीव्र धरणे आणि बोंबाबोंब' आंदोलन सुरू केले आहे. "जोपर्यंत तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही, तोपर्यंत सिंचन भवनासमोरून उठणार नाही," असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.
खडकवासला पाटबंधारे विभागाने ७ मे २०२६ रोजी आंदोलकांना लेखी पत्र देऊन १२ मे २०२६ रोजी इंदापूर तालुक्यासाठी पाणी सोडण्याचे मान्य केले होते. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभारामुळे कालव्याचे पाणी अद्यापही सोडण्यात आलेले नाही. हक्काचे पाणी वेळेत न मिळाल्यामुळे उन्हाच्या तीव्रतेत इंदापूर तालुक्यातील ३६ गावांमधील पिके करपून चालली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मुलगा भरणे शेतकऱ्यांबरोबर या आंदोलनात सहभागी झाला.
१. तात्काळ पाणी आवर्तन सुरू करणे: इंदापूर तालुक्यासाठी तात्काळ पाणी सोडून कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत (Tail-to-Head) पाणी पोहोचविण्याची कारवाई करावी.
२. जानाई-शिरसाई योजनेचे बेकायदेशीर पाणी बंद करा: फेब्रुवारी महिन्यानंतर जानाई-शिरसाई योजनेला पाणी देण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नसताना सध्या सुरू असलेले बेकायदेशीर पाणी तात्काळ बंद करण्यात यावे. तसेच अर्धा टी.एम.सी. वाढीव कोटा रद्द करण्यात यावा.
३. बारमाही पाणीपुरवठा नियम लागू करा: मूळ सिंचन आराखड्यातील तरतुदीनुसार इंदापूर तालुक्याला शेती सिंचनासाठी 'टेल-टू-हेड' नियमाप्रमाणे बारमाही पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. आमचं पाणी कोणी पळवलं याचा जाब आम्ही अभियंत्यांना विचारणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.