डोंबिवली पश्चिम भागात पाणीटंचाईवरून नागरिकांचा संताप
महिलांचा पालिकेवर हंडा-कळशी मोर्चा
संतप्त नागरिकांची प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी
संजय गडदे, साम टीव्ही
डोंबिवली पश्चिमेतील साईनगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या तीव्र पाणीटंचाईविरोधात आज शुक्रवारी महिलांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने त्रस्त झालेल्या महिलांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ह प्रभाग क्षेत्र कार्यालयावर हंडा-कळशी मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
साईनगर परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून अपुरा व अनियमित पाणीपुरवठा सहन करावा लागत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकर तसेच इतर पर्यायी स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेषतः महिलांना घरगुती कामकाजासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्या नाराजीचा उद्रेक झाला.
हातात हंडे आणि कळशा घेऊन महिलांनी ह प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी "पाणी द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू", "पाणी हा आमचा हक्क आहे" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचे सांगितले.
मोर्चादरम्यान नागरिकांनी प्रशासनाला निवेदन सादर करून तात्काळ आणि नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. तसेच पाणीटंचाईचा प्रश्न लवकर मार्गी न लागल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
नागरिकांच्या मागण्यांची दखल घेत आवश्यक उपाययोजना करण्यात येतील आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन संबंधित पालिका अधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.