राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीक विमा देण्याची योजना जाहीर केली. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी या योजनेचा मोठा गाजावाजाही केला. मात्र, प्रत्यक्षात पीक विमा भरताना शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचा प्रकार समोर आला. नाशिकमध्ये एका CSC सेंटरवर पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडून ५० ते १०० रुपयांची मागणी केली जात होती. साम टीव्हीने या संपूर्ण प्रकाराचा पर्दाफाश केला.
साम टीव्हीने शेतकऱ्यांच्या हितासाठी दाखवलेल्या या बातमीची दखल कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा कृषिमंत्र्यांनी दिला आहे. जर असे प्रकार समोर आल्यास संबंधित केंद्रावर कठोर कारवाई करणार, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर केंद्र चालकाने आगाऊ रकमेची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी थेट व्हाट्सप द्वारे तक्रार करावी, असं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं आहे. यासाठी कृषी हेल्पलाईन 9822664455 हा व्हाट्सप क्रमांक जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात किंवा वरील क्रमांकावर शक्य असेल तितक्या पुराव्यासहित तक्रार द्यावी, असंही कृषिमंत्र्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, साम टीव्हीच्या या स्टिंग ऑपरेशनची दखल विधानसभेतही घेण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 'साम'च्या बातमीचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. तसंच शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्याबाबत त्यांनी साम टीव्हीचे आभारही मानले.
साम टीव्हीने दाखवलेली शेतकरी हिताच्या बातमीची राज्य सरकारने देखील गंभीर दखल घेतली. अधिवेशनात याच बातमीचा उल्लेख करत शेतकऱ्यांची जर अशा प्रकारे लूट होत असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांनी CSC केंद्रचालकांवर कठोरात कठोर कारवाई करावी, असे आदेश सरकारच्या वतीने देण्यात आले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.