मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात प्रचंड बहुमताने महायुतीच्या सरकारनं पुनरागमन केलं. भाजपला ऐतिहासिक यश मिळाल्यानं मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये अधूनमधून वादाची ठिणगी पडत असते. मात्र, आम्ही आपआपसात संवाद साधून हे मतभेद दूर करतो, असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात असतो. अशातच एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धाडसी विधान केलं आहे. 'अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांपैकी एकही नेता संवाद साधण्यात चांगला नाही,' असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
'द इंडियन एक्स्प्रेस' या दैनिकाने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान देवेंद्र फडणवीस यांना काही प्रश्न विचारण्यात आले. 'अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोण सर्वांत चांगल्या पद्धतीने संवाद ठेवतात?' असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'त्यांनी मला माफ करावं, पण दोघेही चांगले संवाद साधणारे नेते नाहीत.' मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या धाडसी विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत असून महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचं संकेत तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या माध्यमातून दिले नाहीत ना, अशी चर्चा रंगू लागली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रॅपिड फायर राऊंडमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित इतरही काही प्रश्न विचारण्यात आले. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात नैसर्गिक आपत्तीचं व्यवस्थापन कोणता नेता चांगल्या पद्धतीने करतो? या प्रश्नावर ते म्हणाले की, 'एकनाथ शिंदे यांना नैसर्गिक आपत्तीत स्वत:ला झोकून देण्याची आवड आहे, त्यामुळे मी त्यांचं नाव घेईन.' असं फडणवीस यावेळी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.