NCP Rajya Sabha candidate Rajendra Jain : सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी भंडारा-गोंदियातील राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली. प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जैन यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या निर्णयाची घोषणा केली. मात्र, छगन भुजबळ यांचे नाव राज्यसभेसाठी आघाडीवर असताना ऐनवेळी राजेंद्र जैन यांची निवड का झाली? भुजबळ यांना उमेदवारी देणे का टाळले? याचीच चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. (why Chhagan Bhujbal did not get Rajya Sabha seat)
छगन भुजबळ यांचे वय सध्या ८० वर्षांच्या आसपास आहे. वयाची ऐंशीची मर्यादा ओलांडत असताना सक्रिय राजकारणात त्यांची भूमिका किती प्रभावी राहील, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे; त्यामुळेच त्यांची उमेदवारी नाकारण्यात आल्याची चर्चा एका बाजूला सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला, मराठा समाजाला नाराज करायचे नसल्याने त्यांना उमेदवारी देण्याची जोखीम महायुतीने पत्करली नाही, असेही बोलले जात आहे. कारण, भुजबळांचे सुपुत्र पंकज भुजबळ आमदार आहेत, छगन भुजबळ स्वतः केंद्रात खासदार होणार आणि त्यातच पुतण्यालाही मंत्रिपद दिल्यास मराठा समाजात नाराजी पसरू शकते; यामुळे भुजबळांची अट फेटाळल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यसभेवर जाण्यासाठी होकार दिला होता, पण त्यासाठी त्यांनी एक अट घातली होती. "पुतण्या समीर भुजबळ यांना राज्यात मंत्री करा, मग मी दिल्लीत जातो," असे भुजबळ यांनी पक्षाला सांगितले होते. परंतु, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ही अट फेटाळल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यास नाशिकमधील येवला मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागेल. त्यानंतर समीर भुजबळ आमदार होतील; पण पहिल्याच टर्ममध्ये त्यांना थेट मंत्री करणे योग्य नाही, असे मत केंद्रीय नेतृत्वाने मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच दिल्लीतून भुजबळांची अट अमान्य करण्यात आली. समीर भुजबळ यांना लगेच मंत्री केले, तर जनतेमध्ये सरकारविरोधात नकारात्मक भावना तयार होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय, काही दिवसांपूर्वीच पंकज भुजबळ यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली होती; अशा परिस्थितीत आता पुतण्यालाही मंत्रिपद देणे योग्य नाही, असे मत केंद्रीय नेतृत्वाने व्यक्त केले.
नाशिकमधील येवला मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून तिथे छगन भुजबळ यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र, स्थानिक पातळीवर सुहास कांदे आणि भुजबळ यांच्यात राजकीय वाद आहे. नांदगाव मतदारसंघात समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती आणि भुजबळांनी त्यांना अंतर्गत पाठिंबा दिला होता. यामुळे महायुतीमध्ये मोठे नाराजीनाट्य रंगलं होतं. स्थानिक शिवसैनिकांनी याबाबत मुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रारही केली होती. त्यामुळे भुजबळांना सुरुवातीच्या काळात मंत्रिपद नाकारण्यात आले होते. समीर भुजबळ यांना पुन्हा राजकारणात स्थिरावू न देण्यासाठीच हा विरोध झाल्याचेही बोलले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.