राजपूर आश्रमशाळेच्या वर्ग आणि निवासी खोल्यांमध्ये विषारी साप आढळले
मण्यार आणि घोणससारखे अतिविषारी साप आढळले
विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण
गडचिरोलीतील आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरजवळील राजपूर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजपूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील निवासी खोल्या आणि वर्गांमध्ये मण्यार, घोणस यांसारखे अतिविषारी साप आढळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजपूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत सुमारे ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पावसाळ्यात खिडक्या, दरवाजे आणि इमारतीतील विविध फटींमधून साप आत येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे काही विद्यार्थ्यांनी स्वतः साप पकडून बाटलीत बंद करून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडल्याचे अनुभवही सांगितले आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवित सुरक्षेबाबत शाळा प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गडचिरोलीतील दुर्घटनेनंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत राजपूर आश्रमशाळेत विषारी सापांचा वावर सुरूच राहणे ही चिंतेची बाब आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी इमारतीतील खिडक्या-दरवाजांना सुरक्षित जाळ्या बसवणे, नियमित सर्पप्रतिबंधक तपासणी करणे आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवणे गरजेचे आहे. गडचिरोलीतील घटनेनंतरही प्रशासनाने अजूनही ठोस उपाययोजना केली नाही. प्रशासन आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.