राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीटाने हाहाकार माजवला आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजाचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांचे डोळे पाणावले आहेत. उभं पीक एका रात्रीत जमीनदोस्त झालं आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील आंबा, द्राक्ष, सफरचंद, पपईसह कांदा, मका, लिंबू या पिकांचेही नुकसान झाले आहे. काही भागांत घरांचीही पडझड झाली आहे.
दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील ३० गावांमधील १९९० शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली आहेत. एकूण १२९७ हेक्टरवरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागांना दिला आहे. सर्वाधिक नुकसान ११७५ हेक्टरवरील कांद्याचं झालं असून त्यापैकी ११०० हेक्टरवरील नुकसान एकट्या सटाणा तालुक्यातील आहे. बागलाणमध्ये १८ गावांमधील १७०० शेतकऱ्यांच्या ११५५ हेक्टरवरील पिक आडवी झाली आहेत.
ऐन काढणीला आलेला कांदा अवकाळीमुळे हातचा गेला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालंय. याशिवाय १० हेक्टरवरील गहू, ६० हेक्टरवरील भाजीपाला, २० हेक्टरवरील डाळिंब, २० हेक्टरवरील द्राक्ष पिकांचं नुकसान झालंय. दरम्यान प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे केले जाणारा असून त्यानंतर शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलीय.
सांगली जिल्ह्यातील जत आणि वाळवा तालुक्यात वारणा पट्ट्यात सायंकाळी सुसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या गडगडासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे उन्हाळी भुईमूग, गहू, हरभरा, शाळू मळणी काढणीचे काम रखडले आहे. वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे काहीकाळ जनजीवन विस्कळीत झाले होते. जत तालुक्यातही बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली होती.
नागपूरचा विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे २४ तासात कमाल तापमानात ९ ते १० अंशाची विक्रमी घसरण झाली. चार दिवसांपूर्वी चाळीस अंशावर असलेले तापमान २५ ते २६ अंशापर्यंत खाली आल्याने उन्हाळ्यात नागरिकांना पावसाळ्यात असेल येत आहे. नागपूरचा पारा ३४.८ वरून ९.२ अंशाने खाली घसरून २६.६ अंशावर पडला. तीन दिवसात कमाल तापमानात १४ अंशाची घसरण झाली आहे, तर दिवसभरात गुरुवारी ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात आज उघडीप मिळेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव आळेफाटा परिसरात विजांच्या कडकडात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात तोडणीला आलेल्या निर्यातक्षम द्राक्षांचे भवितव्य शेतातच संपलंय. मुसळधार पावसात तोडणीला आलेल्या द्राक्षांमध्ये पाणी गेल्याने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय खरंतर पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असतो. मात्र सध्याचा पाऊस शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतोय. पुण्यात काल राञी हडपसर, वैदुवाडी याठिकाणी पाऊसवारा यामुळे एका घराचे टेरेसचे लोखंडी एँगल, पत्रा असलेले २०/३० फूट छत उडून लांब असलेल्या पत्र्याच्या घरावर लटकलेल्या अवस्थेत होते. जवानांनी छत काढले असून जखमी कोणीही नाही.
लातूर शहरासह ग्रामीण भागात काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेती पिकांसह ,आंबा फळबागेचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातल्या रेनापुर तालुक्यातील पळशी शिवारात मागच्या तीन दिवसापासून होणाऱ्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने ३ एकरवरील केशर आंबा फळबागेच मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी मदतीच्या अपेक्षा करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.