शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी बंडखोरी करून पक्ष सोडलेल्या खासदाराच्या मतदारसंघात जाहीर सभा घेतली. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात पोहोचताच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली.
सभेला सुरुवात करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "मी बोलायला उभा राहण्यापूर्वी एक घोषणा झाली. कुणाच्या तरी गाडीची चावी हरवली आहे, ती सापडली तर परत द्या, असं सांगण्यात आलं. पण मी तुम्हाला वेगळीच सूचना करतो. आपला खासदार पळून गेला आहे. तो कुठे सापडला तर त्याला परत आणू नका. त्याला तिथेच ठेवा."
पुढे बोलताना त्यांनी विश्वासघाताच्या मुद्द्यावर निशाणा साधला. "आजच्या काळात कोणावर विश्वास ठेवायचा, हा मोठा प्रश्न झाला आहे. काही लोकांच्या रक्तातच गद्दारी भरलेली असते. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वाकचौरे. हा खाऊसाहेब आहे. जिथे जाईल तिथे फक्त खाण्याचाच विचार करतो," असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "मी सभेला येण्यापूर्वी काही लोक मला भेटले. त्यांनी सांगितलं की हा शुभ संकेत आहे. त्यांनी आठवण करून दिली की 2009 मध्ये या गद्दाराला निवडून दिलं होतं. मात्र 2014 मध्ये तो पक्ष सोडून गेला आणि त्यानंतर आपलं सरकार सत्तेत आलं. त्यामुळे आता यांचंही सरकार पडल्याशिवाय राहणार नाही."
शिर्डीच्या पवित्र भूमीचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, "ही साईबाबांची शिर्डी आहे. याठिकाणी श्रद्धा आणि सबुरीला मोठं महत्त्व आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर श्रद्धा असावी लागते. आमची श्रद्धा साईबाबांवर, आपल्या कामावर आणि भगव्या ध्वजावर आहे. पण यांची कोणत्याच गोष्टीवर श्रद्धा नाही. सबुरी तर अजिबात नाही. रोज नवीन बाप शोधण्याचे काम हे करत असतात. थोडा संयम ठेवला असता तर केंद्रात आपलेच सरकार आले असते."
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सत्ता बदलाचे संकेत दिले. पक्षातून काही नेते फुटून सत्ताधारी गोटात गेल्याचा उल्लेख करत त्यांनी, सध्या त्यांना सत्तेची आस लागली आहे अशी टीका केली. मात्र, साईबाबांची कृपा आणि जनतेचा आशीर्वाद लाभला तर येत्या अडीच ते तीन वर्षांत राज्यात आपले सरकार स्थापन होईल, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. भाषणाच्या शेवटी त्यांनी, "100 दिवस शेळीसारखे जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगावे," असे म्हणत आपल्या भाषणाची सांगता केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.