भरत नागणे, साम टीव्ही
सोलापूर/माढा: यावर्षी पावसाळा संपत आला तरी सोलापूर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी हातातोंडाशी आलेली पिके जळून चालली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. परतीचा पाऊस तरी पडावा, या आशेने माढा तालुक्यातील मोडनिंब येथील शेतकऱ्यांनी चक्क गाढवाचे लग्न लावून अनोख्या पद्धतीने वरुणराजाला साकडे घातले.
ग्रामीण भागात गाढवाचे लग्न लावल्यास वरुणराजा प्रसन्न होऊन पाऊस पडतो, अशी जुनी आख्यायिका आहे. याच श्रद्धेतून मोडनिंब येथील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर गाढवाचा थाटामाटात विवाह सोहळा आयोजित केला. यावेळी गाढवाला हळद लावण्यात आली. त्यानंतर हार घालून आणि गुलालाची उधळण करत पारंपरिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. या अनोख्या लग्न सोहळ्यासाठी गावातील अनेक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाऊस पडावा आणि शेती वाचावी, यासाठीच हा नवस केला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.** पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक बंधारे कोरडे पडले असून जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे परतीचा पाऊस पडून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पावसासाठी शेतकऱ्यांनी केलेला हा अनोखा उपाय चर्चेचा विषय ठरला असून, आता वरुणराजा शेतकऱ्यांची ही हाक ऐकतो का आणि सोलापूर जिल्ह्यात परतीचा पाऊस बरसतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.