मुंबई : येथील सोमय्या मैदानात भाजपने (bjp) बुस्टर डोस सभा घेवून महाविकास आघाडी सरकारवर शरसंधान साधलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी बाबरी मशीद पाडण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही तोफ डागली. बाबरी मशीद कोणा एका पक्षाने नाही तर रामभक्तांनी पाडली. त्यावेळी राम मंदिर आंदोलनात मी स्वत: सहभागी होतो. त्यासाठी बदायुच्या कारागृहात १४ दिवसांचा कारावासही मी भोगला होता. असं वक्तव्य फडणवीस यांनी बुस्टर डोस सभेत केलं होतं. त्यानंतर बाबरी मशीद पाडण्याच्या मुद्यावरुन भाजप-शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सुरु झालीय. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडवीसांचा १८५७ लढ्यातही खूप योगदान आहे. असं म्हणत आदित्य ठाकरेंनी फडवीसांना टोला लगावला आहे.
माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले, या वादात जाण्यापेक्षा आता राम मंदिराचं निर्माण चांगलं होतंय. ही चांगली गोष्ट आहे. कोर्टाने चांगला निर्णय दिलाय. शिवसेनेने पुन्हा एकदा तो संघर्ष हाती घेतला होता, त्यानंतर कोर्टाचा निकाल लागलेला आहे . पण त्याच्याही पुढे जाऊन सध्या देश आणि राज्यसमोर बेरोजगारी वाढलीय आणि महागाई वाढलीय. या विषयावर राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे. एका बाजूला महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही महाराष्ट्रात चांगली काम करत आहोत. विकासाची कामं सुरू आहेत आणि दुसऱ्या बाजूला वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे.
तसंच ठाकरे यांनी मशिंदीवरील भोंग्याच्या मुद्यावरही भाष्य केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, एक फरक तुम्ही ओळखून घ्या. महाविकास आघाडी सरकार घरोघरी चूल पेटवण्याचं काम करतेय आणि काही विरोधी पक्ष घर पेटवण्याचं काम करतायत. त्याच्यात लोक हुशार आहेत. त्यांनी ओळखून घेतलंय, आपणही ओळखून घ्यायला हवं.
Edited By - Naresh Shende
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.