आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र, त्यांच्यात खरंच मनोमिलन होणार की नाही, यावर अद्यापही कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. दरम्यान, ठाकरे गटात नेत्यांचा ‘इनकमिंग’ सुरू आहे, तर दुसरीकडे मनसेमध्ये मात्र गळती सुरू झाल्याचं चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर, शरद पवारांनी राज ठाकरेंवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. "राज ठाकरे यांच्या सभांमध्ये गर्दी असते, पण त्यातून मतपरिवर्तन होत नाही," असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.
शरद पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. या अनौपचारिक चर्चेदरम्यान त्यांनी राज ठाकरेंवर ताशेरे ओढले. '"राज ठाकरे यांच्या सभा उत्तम होतात, त्यांना गर्दीही चांगली मिळते, मात्र त्या सभा मतांमध्ये फारसं परिवर्तन घडवत नाहीत. असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्याउलट उद्धव ठाकरे यांच्या सभांमुळे मतांमध्ये ठोस परिवर्तन दिसून येतं', असं शरद पवार म्हणाले आहेत.
तसेच 'आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढवाव्यात', अशी इच्छा पवारांनी व्यक्त केली आहे. तसेच महायुती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवतील असं चित्र दिसत नाही, असंही मत त्यांनी पत्रकारांसोबत झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये व्यक्त केलं आहे.
मनसेचा एकमेव शिलेदार फुटला
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. अशातच मनसेचे एकमेव माजी नगरसेवक संजय तुर्डे यांनी मनसेची साथ सोडली. मनसेमधून बाहेर पडत त्यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. यामुळे मनसे पक्षाला तसेच राज ठाकरेंना मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जात आहे. या प्रवेशामुळे शिंदे गट अधिक बळकट होत असल्याचं बोललं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.