त्रिभाषा सुत्राचा घाट सरकारने घातला जरी असला तरी काही राजकीय नेत्यांकडून आणि जनतेकडून कडाडून विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्रिभाषा सूत्राविरोधात ५ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे देखील या मोर्चात सहभागी होणार असल्याचं स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
राज ठाकरे यांनी मराठी पालक, विद्यार्थी आणि सर्व मराठी बांधवांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी पुकारलेला हा मोर्चा भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.
भाजपच्या कोअर कमिटीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत रणनीती ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडून आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिल्याचा मुद्दा जोरदारपणे मांडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न जनतेपर्यंत पोहोचवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.
संजय राऊतांकडून सुचक ट्विट
हिंदी भाषा सक्तीविरोधात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पक्ष मैदानात उतरणार आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंन पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच मराठी भाषेच्या अस्मितेसाठी मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं. या मोर्चानिमित्त ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमुळे अनेकांना सुखद धक्का बसला आहे.
संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ठाकरे बंधूंचा एकच मोर्चा निघेल असं जाहीर केलं. त्यामुळे येत्या ५ जुलैला ठाकरे बंधू आणि मराठी बांधव एकत्र रस्त्यावर उतरून मराठी भाषेसाठी लढा देणार, परिसर दणाणून टाकणार, एवढं मात्र नक्की.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.