मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडलीय. अंबा नदीला आलेल्या पुरामुळे रविवारी वाकण पाली राज्य महामार्गावरील वाकण आणि वजरोली गावाजवळ मोठी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. येथील पुराच्या पाण्यात तब्बल २८ नागरिक अडकून पडले होते, ज्यांना रेस्क्यू टीमने अत्यंत शिताफीने सुखरूप बाहेर काढले.
वजरोली गावाजवळ अंबा नदीच्या किनारी काही बंगल्यांचे बांधकाम सुरू होतं. नदीचे पाणी अचानक वाढल्यामुळे या बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी असलेले २० मजूर आणि नागरिक अडकले. दुसरीकडे, वाकण नाक्याजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये ८ जण पुराच्या पाण्यात वेढले गेले होते. पाण्याचा वेढा इतका वेगाने वाढला की, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या सर्वांना हॉटेलच्या छतावर आसरा घ्यावा लागला होता, असं रेस्क्यू टीमचे सदस्य सागर दहिंबेकर यांनी सांगितलं.
या घटनेची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुराच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असतानाही टीमच्या सदस्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून बचावकार्य सुरू केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हॉटेलच्या छतावरील ८ जणांना आणि बंगल्याच्या कामावरील २० जणांना अशा एकूण २८ नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सर्वांना सुखरूप ठिकाणी हलवण्यात आले आहे. या यशस्वी मोहिमेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. स्थानिक नागरिकांनी रेस्क्यू टीमच्या धाडसाचे मोठे कौतुक केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.