पुणे : दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आम्हाला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आमच्या सांविधानिक अधिकारांचे उल्लंघन झाले आहे, असा दावा करत सुटका करण्याची मागणी करणारी याचिका शिवानी आणि विशाल अग्रवाल यांनी केली आहे. कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात या दोघांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस.एम.मोडक यांच्या खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाने या याचिकेसह अशाच प्रकारच्या ४० याचिका दोनपेक्षा जास्त न्यायमूर्ती असलेल्या खंडपीठाकडे पाठविल्या आहेत. अपघाताच्या घटनेनंतर अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणात मुलाचे वडील तथा विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि आई शिवानी अग्रवाल यांना जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती.
शिवानी यांनी मुलाच्याऐवजी स्वतःचे रक्त तपासणीसाठी दिल्याचे समोर आले होते. तर विशाल यांच्या सांगण्यावरून ससूनच्या आपत्कालीन विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी शिवानी यांचे रक्त घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र, अटक करताना कायदेशीर प्रक्रिया पाळण्यात आली नाही असे नमूद करत अग्रवाल दाम्पत्याचे वकील यांनी याचिका दाखल केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.