पंढरपूर : संपूर्ण राज्यात ऊस आणि साखर उत्पादनात आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील साखर उद्योगाला यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे. दुष्काळी परिस्थिती आणि इतर पिकांकडे वाढलेला कल याचा परिणाम साखर उद्योगावर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोलापूर जिल्ह्यात तब्बल ७१ लाख ४४ हजार टन ऊसाचे उत्पादन घटले आहे. परिणामी साखर उत्पादनात देखील मोठी घट झाली आहे.
ऊसाचे उत्पादन चांगले झाल्यास साखर उत्पादन होण्यास मदत होत असते. मात्र गतवर्षी उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस लागवडीचे क्षेत्र घटले आहे. इतकेच नाही तर यंदा उत्पादनात देखील घट झाली आहे. याचा फटका ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांना बसला आहे. यंदा ७७ लाख ६२ हजार टन साखर उत्पादनात घट झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना हजारो कोटी रुपयांना आर्थिक फटका बसला आहे.
गतवर्षी दीड कोटी मेट्रिक टन गाळप हंगाम
मागील वर्षीच्या गाळप हंगामात (2023-24) जिल्ह्यातील ३६ साखर कारखान्यांनी १ कोटी ७३ लाख ५१ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले होते. त्यामधून १ कोटी ६४ लाख ४ हजार टन साखर उत्पादन घेतले होते. यावर्षी मात्र ऊस आणि साखर उत्पादनात मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. यावर्षीचा जिल्ह्यातील साखर कारखान्याचा ऊस गाळप हंगाम नुकताच संपला आहे. त्यानंतर समोर आलेली साखर उत्पादनाची आकडेवारी सोलापूर जिल्ह्यतील साखर उद्योगासाठी चिंता व्यक्त करायला लावणारी आहे.
यंदा केवळ ८६ लाख टन साखर उत्पादन
यावर्षी ३३ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. सरासरी पावणे तीन महिने हंगाम चालला. यामध्ये १ कोटी २ लाख ७ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप झाले. तर फक्त ८६ लाख ४२ हजार टन साखरेचे उत्पादन मिळाले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात मोठा फटका साखर उद्योगाला बसला आहे. अर्थात शेतकऱ्यांना देखील हा फटका बसला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.