आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आल्या असताना विरोधक व्होट चोरीच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झालेत. मुख्य निवडणूक अधिका-यांची 14 ऑक्टोबरला भेट घेतल्यानंतर आता विरोधकांनी पुढचं पाऊल टाकलंय. खासदार संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, मनसे नेते नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, काँग्रेस नेते सचिन सावंत, कॉम्रेड प्रकाश रेड्डी आदी नेत्यांची मुंबईत दादरच्या शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा काढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक या मोर्चात सहभागी होतील, असे संजय राऊतांनी सांगितले.
तर सत्ताधाऱ्यांनी मतदारयाद्यांमध्ये घोळ करुनच विधानसभा निवडणूक जिंकली असा आरोप काँग्रेसने केलाय.दुसरीकडे जयंत पाटील यांनीही चुकीचे पत्ते, दुबार नावे यावर बोट ठेऊन निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढलेत.
विरोधकांनी एकीची वज्रमूठ आवळत मतदार याद्यांमधील घोळावर बोट ठेवलं आहे. महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं यापूर्वी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन निवेदनही दिलं आहे. मतदार याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नका असं स्पष्टपणे सुनावत राज ठाकरेंनी आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. आता त्यापुढे जाऊन विरोधकांनी रस्त्यावर उतरण्याचं ठरवलंय. या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतोय ? आणि विरोधकांच्या या रेट्याने खरंच मतदारयाद्या स्वच्छ होऊन पारदर्शकपणे निवडणुका होणार का?याकडे राज्याचं लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.