अजय सोनवणे
मनमाड (नाशिक) : यंदा राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. यामुळे दुष्काळी परिस्थिती उद्भवेल अशी परिस्थीती नाही. येवला तालुक्यात देखील चांगला पाऊस झाला असताना येवला उत्तर पूर्व भागात जानेवारी - फेब्रुवारी महिन्यातच दुष्काळाची चाहूल लागण्यास सुरवात झाली आहे. या परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने टँकर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होऊन देखील जानेवारी- फेब्रुवारी महिन्यातच येवल्याच्या उत्तर पूर्व भागातील विहिरींनी तळ गाठल्याचे पाहण्यास मिळत आहे. मुळात यंदाच्या पावसाळ्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने अनेक भागात जलमय परिस्थिती निर्माण झाली होती. नदी, नाल्यांना पूर आल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याची समस्या मिटेल व दुष्काळ जाणवणार नाही. अशी परिस्थिती होती. मात्र येवला तालुक्यात आतापासूनच विहिरींचे पाणी आटले आहे.
शंभर गावांना पाणी टंचाईचा सामना
येवला तालुक्यातील सुमारे १०० गावे व वाड्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. यात प्रामुख्याने राजापूर, ममदापूर, रहाडी आहेरवाडी, जायदरे, हडप सावरगाव, सोमठाण जोश, पांजरवाडी, गारखेडे बदापूर, देवळाणे, धामणगाव, बोकटे या गावांचा समावेश आहे. या गावांमधील परिसरातील विहिरींची पाणी पातळी खालावली असल्याने पाण्याचा तुटवडा जाणवू लागला असून येत्या काही दिवसात पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.
शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न
येवला तालुक्यातील काही भागात जानेवारी संपताच दुष्काळाची चाहूल लागली असून पिण्यासाठी तसेच शेती सिंचनासाठी पाणी आता कमी पडू लागले आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील भेडसावत आहे. यामुळे स्थानिक शेतकरी चिंताग्रस्त आहे. शासनाच्या कृती आराखड्यामध्ये काही गावांना टँकरची गरज भासणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.