देवळा तालुक्यात कौटुंबिक वादातून महिलेची हत्या
आरोपीने चाकूने वार करून गंभीर जखमी केले
उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू
ग्रामस्थांच्या मदतीने आरोपी अटक, पोलिस तपास सुरू
अजय सोनावणे, मनमाड
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाऊजीने मेहुणीची हत्या केली आहे. भऊर फाटा परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. छाया ज्ञानेश्वर जाधव असे मृत महिलेचे नाव असून श्याम माळी असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, श्याम माळी आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. हे वाद मिटवण्यासाठी छाया जाधव या त्यांच्या पती, आई आणि भावासह श्याम माळी याच्या घरी गेल्या होत्या. कुटुंबातील वाद शांततेत सोडवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अचानक परिस्थिती बिघडली.
रागाच्या भरात आरोपी श्याम माळीने छाया जाधव यांच्या छातीवर चाकूने वार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने कळवण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेत छाया यांचा भाऊ सोनू कराटे यालाही चाकूचे वार लागून तो जखमी झाला आहे.
घटनेनंतर आरोपी श्याम माळी हा घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र खामखेडा गावाचे लोकनियुक्त सरपंच ॲड. वैभव पवार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे एक निरपराध महिलेचा बळी गेला असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.