सातपुड्यातील दुर्गम सादरी पाड्यावर प्रथमच नळाद्वारे पिण्याचे पाणी
नर्मदा नदीतून ७ ते ८ किलोमीटर पाइपलाइन टाकून पाणीपुरवठा करण्यात आला
यंग फाउंडेशन आणि डीजेड फाउंडेशन यांनी हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केला
वर्षानुवर्षे पाणीटंचाई सहन करणाऱ्या ग्रामस्थांना मोठा दिलासा
सागर निकवडे, नंदुरबार
Maharashtra Nandurbar Satpuda राज्यात गेले ३ महिने तापमानाचा पारा ३५ ते ४० अंशावर आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले असताना अनेक ठिकाणी पाणी टंचाईची गंभीर समस्या आहे. ही पाणी टंचाई महिनाभराची असली तरी नागरिकांच्या तोंडचं पाणी पळवणारी असते. मात्र महाराष्ट्रात एक गाव असं आहे जिथे वर्षानुवर्षे पाणी टंचाईची समस्या भेडसावत होती. "धरण उशाला आणि कोरड घशाला" अशी परिस्थिती अनेक वर्षे सहन करणाऱ्या सातपुड्याच्या दुर्गम सादरी पाड्यावरील ग्रामस्थांची अखेर तहान भागली आहे. नर्मदा नदीच्या पात्रातून तब्बल सात ते आठ किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन टाकून या पाड्यावर प्रथमच नळाद्वारे पिण्याचे पाणी पोचवण्यात आले. या गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात असलेल्या सादरी परिसरातील अनेक पाड्यांवर वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या होती. डोंगर-दऱ्यांनी वेढलेल्या या भागात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी दररोज अनेक किलोमीटर पायपीट करावी लागत होती. उन्हाळ्यात ही समस्या अधिकच गंभीर बनत होती. या परिस्थितीची दखल घेत यंग फाउंडेशन आणि डीजेड फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला.
सुरुवातीला परिसरात विहीर खोदून पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अपेक्षित यश न मिळाल्याने संस्थांनी नर्मदा नदीच्या पात्रातून सोलर पंपाच्या मदतीने पाणी उचलून ते सादरी पाड्यापर्यंत (Satpuda Sadri Pada Water Project) पोचवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प पूर्ण करणे सोपे नव्हते. दुर्गम डोंगराळ भागातून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर पाईपलाईन टाकावी लागली. अनेक ठिकाणी वाहन पोहोचू शकत नसल्याने साहित्य होडीच्या साहाय्याने नेण्यात आले. स्वयंसेवक आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे अखेर हा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाला.
नळातून पहिल्यांदाच पाणी येताना पाहून गावातील लहान मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अनेक चिमुकले नळाखाली भिजत आनंद साजरा करताना दिसले, तर ज्येष्ठ ग्रामस्थांनी हा क्षण आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी डीजेड फाउंडेशनचे दिलीप जैन यांनी सांगितले की, दुर्गम भागातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा भागांमध्ये शासनाने अधिक सक्रिय होऊन विकासकामांना गती देण्याची गरज आहे. सादरी पाड्यावर पोहोचलेले हे नळाचे पाणी केवळ तहान भागवणारे नाही, तर दुर्गम भागातील विकासाची नवी आशा आणि उज्ज्वल भविष्याची नांदी ठरत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.